जळगाव : राज्यात भाजपचं सरकार येण्यामागे एकनाथ खडसे यांचं मोठं योगदान असून, त्यांच्यावरील अन्याय संपेल आणि त्यांना न्याय मिळेल, असे जळगावात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. मुक्ताईनगर तालुक्यातील कोठळीमध्ये आज भाजप नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते.


चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?

“राज्यात भाजपचं सरकार येण्यामागे एकनाथ खडसे यांचं मोठं श्रम आहे. अन्याय कुणावरही कायम नसतो. त्यातून न्याय मिळतो. एकनाथ खडसेंवरील अन्याय संपेल आणि त्यांना न्याय मिळेल.”, अशी अपेक्षा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

एकनाथ खडसे काय म्हणाले?

यावर बोलताना एकनाथ खडसे यांनी आपल्याला आता कुठलीच अपेक्षा नसल्याचं सांगताना, दिवार चित्रपटातील अमिताभ आणि शशी कपूर यांच्यातील संवादाचा आधार घेतला आणि आपल्यामागे लोकं असल्याचं म्हटलं.

खडसेंचा सरकारला इशारा

तसेच, एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला. “आपण क्लीन चिट आहोत, असं सरकार म्हणायला तयार नाही. त्यामुळे वाढदिवशी आपण एक संकल्प करतोय, आपण दोषी आहोत की नाही हे जनतेला पटवून देण्यासाठी महाराष्ट्रभर दौरा करणार आहोत.” अशी घोषणा एकनाथ खडसेंनी केली. तसेच, जनतेने सांगितलं की तुम्ही दोषी आहात, तर राजकारण सोडून देईन, असा इशाराही खडसेंनी यावेळी दिला.

दरम्यान, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री आहेत, असेही खडसे म्हणाले. तसेच, आपण भाजप सोडणार नाही, असे सांगायलाही खडसे विसरले नाहीत.