सांगली : काँग्रेसची 'जनसंघर्ष' यात्रा ही जनतेत भाजप सरकारविरोधात वातावरण ढवळून काढण्यासाठी असली तरी ती काँग्रेस पक्षाला मनोमिलन यात्रा ठरत आहे. महाराष्ट्रात काँग्रेस नेते जिल्हा, तालुका पातळीवरील वाद संपवून एकत्र येत असल्याचं चित्र दिसून येत आहे.


जनसंघर्ष यात्रा इचलकरंजीत येताच राज्याचं आणि काँग्रेसचं नेतृत्व करणारे राज्याचे दोन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण एकत्र एकाच गाडीत.. टपावर दिसले. कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं. कोल्हापूरच्या सभेत तर चक्क राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांनी एकमेकांवर स्तुतीसुमनं उधळली.

यात्रेत कोल्हापूर जिल्ह्यातील दोन दिगगज नेते कलाप्पा आवाडे आणि जयवंतराव आवळे हे दोन्ही नेते 15 वर्षांनी एका व्यासपीठावर आले. त्यांच्यातील मतभेद संपले. हे चित्र काँग्रेससाठी आशादायी आहे. इचलकरंजीच्या सभेतही काँग्रेस नेत्यांनी हाच सूर आवळला.

''ज्या तालुक्यात मतभेद होते ते मिटवले. अण्णा (प्रकाश आवाडे) तुम्ही आमदार झाल्यावर पुढची सभा घ्यायची,'' असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी इचलकरंजीतून प्रकाश आवाडे उमेदवार असतील हे सूचित केलं.

सांगलीतही हेच चित्र होतं. युवा काँग्रेस नेते आणि आमदार विश्वजित कदम आणि वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील देखील आपले मतभेद विसरून जनसंघर्ष यात्रेत सामिल झाले.

जनसंघर्ष यात्रा सुरू होण्याच्या आधी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद संपवले.

यात्रेच्या उद्घाटन समारंभातही महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं, की ''काँग्रेसमध्ये उत्साह आहे, पण गरज आहे 'तन मन धन'ने एकत्र काम करण्याची. तसं काम झालं तर या यात्रेचा उद्देश सफल होईल" जनसंघर्ष यात्रेत हे चित्र सध्या दिसत आहे. हाच उत्साह निवडणुकीतील मतदानाच्या दिवसापर्यंत टिकवण्याचं आव्हान काँग्रेससमोर आहे.