पंढरपूर : पंढरपूर शहरात गेल्या 15 तासांपासून अखंड पावसाचा धुमाकूळ सुरू असताना आज दुपारी चंद्रभागा तीरावर असलेल्या कुंभार घाटाची भींत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. रात्रभर मुसळधार पावसाने कुंभार घाटावरील नवीन घाटाचे बांधकाम कोसळल्याने ही दुर्घटना घडली. अग्निशमन दल व आपत्कालीन यंत्रणेने हे सर्व सहा मृतदेह दगड ढिगाऱ्याखालून बाजूला काढले आहेत. ठेकेदारावर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका तेथील कोळी समाजाने घेतली आहे.


पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या काठावर नवीन घाट बांधून सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. जलसंपदा विभागाकडून हे घाट बांधणीचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. चुना वापरून दगडाचे बांधकाम केलेले आहे. मात्र, कुंभार घाटावर असणारं हे बांधकाम तिथेच राहणाऱ्या काही लोकांच्या अंगावर कोसळले. यामध्ये आत्तापर्यंत सहा जणांचे मृतदेह मिळाले आहेत. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत माजी नगरसेवक रमेश कांबळे यांनी काही दिवसांपूर्वी उपोषण करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. या ठेकेदारावर गुन्हा दाखल न केल्यास मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका कोळी समाजाने घेतली आहे.


राज्यात सलग चौथ्या दिवशी पावसाचा कहर! ग्रामीण भागासह शहरांनाही फटका; पुढील तीन दिवस असेच राहणार : IMD


कुंभार घाटा जवळील या नवीन घाट सुशोभीकरणाच्या कामाच्या जवळच या लोकांनी छोट्या छोट्या झोपड्या टाकल्या होत्या. त्या ठिकाणी ते फुल विक्री, प्रसाद विक्री, नारळ विक्रीचा व्यवसाय करत होते. त्यावरच आपली गुजराण करत होते. मात्र, आज दुपारी दीडच्या सुमारास मुसळधार पावसाने नवीन घाटाचे बांधकाम कोसळले. वीस फूट उंचीची भिंत या लोकांच्या अंगावर कोसळली. यामध्ये सहा जणांचे मृतदेह सापडले आहेत. यामध्ये गोपळ अभंगराव, राधा अभंगराव, मंगेश अभंगराव, पिलू जगताप, इतर अनोळखी व्यक्तीचे मृतदेह सापडले असून यात दोन यवतमाळ भागातील वारकरी महिलांचे मृतदेह असल्याचे सांगितले जात आहे.

कुंभार घाट येथील दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या कुटुंबियांना शासनाकडून मदत देणार याशिवाय या बांधकामातील ठेकेदाराच्या कामाची चौकशी करून दोषी असेल तर कारवाई करणार असल्याची घोषणा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे.

Pandharpur | पंढरपुरातील कुंभार घाटाची भिंत कोसळली, आडोशाला उभ्या असलेल्या 4 जणांचा मृत्यू