मुंबई : अभिनेत्री केतकी चितळेच्या पोस्टवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray on Ketki Chitale) तीव्र शब्दात निषेध केला आहे.  आपल्या सभांमधून पवारांवर निशाणा साधणाऱ्या राज ठाकरेंनी पत्रक काढून केतकी चितळेच्या फेसबुक पोस्टवर तीव्र शब्दात निषेध दर्शवलाय. कुणीही महाराष्ट्राची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये असं राज ठाकरेंनी या पत्रकात  लिहिलंय. तर अशा लिखाणाला महाराष्ट्राच्या संस्कृतीत जागा नसल्याचं मतही राज ठाकरेंनी पत्रकातून व्यक्त केले आहे. 


केतकी चितळेला राज ठाकरेंची पत्रक काढून समज


राकोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात काहीतरी फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही.त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, असे म्हणत राज ठाकरेंनीही केतकी चितळेला कडक शब्दात समज दिली आहे. 


काय म्हणाले राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये?


महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच वर्ष कार्यरत असलेल्या शरद पवारांविरुध्द तिन किंवा त्या भावेनं हे लिहिणं साफ गैर आहे. विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. एखादा हलका विनोद वगैरे आपण समजू शकतो, त्यातली विनोदबुध्दीही आपण ओळखतो, तशा टीका महाराष्ट्राला नव्या नाहीत. आमचे त्यांच्याबरोबर मतभेद जरूर आहेत आणि रहातील, परंतु अशा घाणेरड्या पातळीवर येणं साफ चूक आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हे इथे फार स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे, असं लिहिणं ही एक प्रवृत्ती नव्हे तर मानसिक विकृती आहे. तिला वेळीच आवर घालायला पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले. 






 राज्य सरकारने या प्रकरणाचा लवकर छडा लावावा : राज ठाकरे


राज ठाकरे आपल्या पत्रात पुढे म्हणाले,  चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणं हेच आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या महापुरुषांनी, संतांनी तसेच असंख्य बुद्धीमान विचारवंतानी आपल्याला शिकवलं! कोणीही या राज्याची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये हीच अपेक्षा आहे. पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्ती ह्या खरंच आहेत की नवा वाद उकरून काढण्यासाठी कोणाची तरी उठाठेव सुरू आहे हे देखील तपासणे गरजेचे आहे. कारण हा अशाच चार-दोन विकृत टाळक्यांमुळे समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण होते,समाज दुभंगतो. द्वेषाची पातळी किती खालपर्यंत आली आहे हे आता राज्यकर्त्यांनाही समजलं असेलच. हे सगळं महाराष्ट्रात वेळीच आवरणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्राची ओळख वेगळी आहे. म्हणूनच राज्य सरकारनं याचा  नीट छडा लावून हा गोष्टींचा ताबडतोब बंदोबस्त करावा.