Sanjay Raut On  Rajya Sabha Election 2022: राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) महाराष्ट्रातील सहा जागांसाठी येत्या 10 जून रोजी मतदान होणार आहे. राज्यसभेच्या या सहा जागांसाठी सात उमेदवारांनी अर्ज दाखल केला . भाजपनं (BJP) तिसरा अतिरिक्त उमेदवार रिंगणात उतरवलाय. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात उतरल्यानं निवडणूक होणार दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या शिष्टमंडळानं काल (03 जून 2022) भाजप नेते आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव दिला. परंतु, भाजपनं निवडणूक लढण्याचा निश्चय पक्का केल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून ते भाजपवर बरसल्याचं पाहायला मिळालं. 


संजय राऊत यांनी नुकताच प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, "महाविकास आघाडीतील नेत्यांच्या शिष्टमंडळानं भाजप नेते आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र, त्यांनी निवडणूक लढण्याचा निश्चय पक्का केलाय. अशावेळी कोणी कोणाला रोखू  शकत नाही. महाविकास आघाडी सुद्धा सत्तेवर आहे. आम्ही पण ताकदीनं सत्तेवर उतरलेलो आहोत. प्रश्न सहाव्या जागेचा आहे. भाजप अपक्ष आणि इतर पक्षांवर अवलंबून आहे. ते त्यांना आमिष आणि प्रलोभन दाखवणार. त्यांच्यावर दबाव कशाप्रकारे आणला जातोय? याची माहिती आमच्याकडं रोज येतेय. कारण ज्यांच्यावर दबाव आणले जातायेत ते आमचेही मित्र आहे. ईडी आणि जुनी प्रकरणं आणि केंद्राच्या अखत्यारीत येणारी प्रकरणं उकरुन काढत त्रास दिला जातोय. यात भाजपचे चारित्र्य उघडं होतंय."


राज्यसभेच्या चारही जागा महाविकास आघाडी जिंकणार
"राज्यसभेच्या चारही जागा महाविकास आघाडी जिंकणार. भाजपने उगाच आपले पैसे वाया घालवू नये. एखाद्या सामाजिक कार्यात वापरावे. सवय आणि चटक लावू नये. बाकी आम्ही समर्थ आहोत. गेल्या 50 वर्षांपासून आम्ही निवडणुका लढवत आहोत. अशा निवडणुकांचा आम्हाला चांगला अनुभव आहे. फक्त आमच्या हातात ईडी नाही. पण बाकी इतर बऱ्याच गोष्टी सरकार म्हणून आमच्या हातात आहे, हे लक्षात घ्या" असाही इशारा संजय राऊतांनी विरोधकांना दिला आहे.


कोण कोणासोबत आहे? हे 10 जूनला कळणार
"राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे चार उमेदवार आहे. सहाव्या जागेसाठी सर्वांच्या मनात काही प्रश्न उपस्थित होत आहेत. त्या जागेवर असलेले उमेदवार बहुमतांनी विजय मिळवून राज्यसभेतही जातील. आम्ही निवडणुकी टाळण्याचा प्रयत्न केला. पण भाजपला त्यांच्या अधिकारांचा गैरफायदा घेऊन महाराष्ट्राचं वातावरण खराब करायचं आहे. आम्ही सत्तेवर आहोत, हे तुम्ही विसरू नका. कोण कोणाबरोबर आहे हे 10 जूनला कळेल. तुम्ही आत्ताच का पत्ते पिसत आहात. बहुजन विकास आघाडी कुठे आहे? एमआयएम कुठे आहे? बच्चू कडू आणि आमदार कुठे आहे? हे 10 तारखेलाच कळेल", असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.


हे देखील वाचा-