Maharashtra Rain : बीड (Beed) जिल्ह्यात वीज पडून एकाच मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. वैजापूर तालुक्यातील शिवराई शिवारात वीज पडून एक जण ठार तर तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली आहे. भागवत काशिनाथ डीके, वय 32  राहणार शिवराई असं या घटनेतील मयत व्यक्तीचे नाव आहे. तर सचिन आसाराम सोनवणे, वनिता सागर सोनवणे, निता सचिन सोनवणे हे या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. 


वीज पडून एकाचा मृत्यू, तीन जण जखमी


या घटनेबाबत स्थानिकांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोनवणे कुटुंबीय हे शिवराई शिवारात गट क्रमांक 22 मध्ये पेरणी करत असताना दुपारी 3 वाजेच्या सुमारास पाऊस सुरू झाला. त्यामुळे चौघेही मोकळ्या जागेत बसले. दरम्यान अचानक त्यांच्यावर वीज कोसळली या घटनेत चौघे गंभीर जखमी झाले चौघांना तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, भागवत यांना वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मृत घोषित केले तर तिघांवर वैजापूर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळाली आहे.


बीड-पिंपळनेर रस्ता बंद, मुसळधार पावसानंतर सगळीकडे पाणीच पाणी 


बीड शहराजवळील पिंपळनेर परिसरामध्ये आज सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली दीड ते दोन तास झालेल्या पावसाने परिसरात सगळीकडे पाणीच पाणी झाल्याचे चित्र पाहायला मिळत होतं. मृग नक्षत्राच्या आगमनालाच पाऊस आणि सुरुवात केल्यानंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस या परिसरात झाला आणि या पावसामुळे मनकर्णिका नदीला पाणी आले आहे. नदीला पाणी आल्याने बीड-पिंपळनेर हा रस्ता काही काळ बंद राहणार आहे. 


अनेकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं


आज वाशिम जिल्ह्यात दुपारच्या दरम्यान जोरदार पावसाने हजेरी लावली त्यामुळे शेतकरी काही प्रमाणात सुखावला असला. मात्र, वाशीमच्या मंगरुळपीर तालुक्यातील गिंभा गावात मुसळधार पाऊस सुरु झाल्याने अनेकांच्या घरात पावसाचं पाणी घुसलं. यामुळे संसार उपयोगी साहित्य भिजून मोठं नुकसान झालं आहे. जनजीवन विस्कळीत झालेलं नुकसानाची पाहणी करून भरपाई देण्याची मागणी महसूल प्रशासनाकडे ग्रामस्थांनी केली आहे.


जालन्यात वाऱ्यासह जोरदार पाऊस 


जालना येथे दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा जोरदार पावसाच आगमन झालं जालना शहर आणि परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. आजच्या पावसामुळे वातावरणात गारवा पसरला होता,जालना तालुक्यासह बदनापूर, घनसावंगी आणि अंबड तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसात दमदार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला देखील सुरुवात केलीय.


दमदार पावसाच्या हजेरीमुळे पेरणीला सुरुवात


जळगाव जिल्ह्यात यंदा मान्सूनच्या पावसाने वेळेत दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठ दहा वर्षाच्या पासून पावसाचे आगमन उशिरा होत असल्याचा अनुभव असताना, यंदा वेळीच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. वेळीच पाऊस आणि वेळीच पेरण्या झाल्याने त्याचा उत्पादनावर देखील परिणाम होणार असल्याचं अनुभवी शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.