Maharashtra Weather : राज्यातील हवामानात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. सध्या राज्याच्या विविध भागात थंडीचा (Cold) जोर वाढताना दिसत आहे. मुंबईसह कोकणात सरासरीइतकी तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक थंडी जाणवेल, अशी माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. मुंबईसह संपूर्ण कोकणातील 7 जिल्ह्यात पहाटेचे  आणि दुपारचे असे दोन्हीही वेळचे किमान व कमाल तापमाने सध्याच्या दिवसात असणाऱ्या सरासरी तापमानाइतके म्हणजे पहाटेचे किमान 14 तर दुपारी कमाल 30 डिग्री से. ग्रेड दरम्यानचे जाणवत आहे. 


कोणत्या जिल्ह्यात कसं असेल तापमान?


खान्देश, नाशिक, अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, नागपूर, भंडारा आणि गोंदिया अशा 14 जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान हे 8 ते 10 डिग्री से.ग्रेड (म्हणजे सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा 1 ते 2  डिग्रीने कमी  तर दुपारचे कमाल तापमान 26 डिग्री से. ग्रेड(म्हणजे सरासरी पेक्षा 2 डिग्रीने  कमी) दरम्यानचे असू शकते अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. दक्षिण अर्ध महाराष्ट्रातील  सातारा ते जालना ते वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीपासून दक्षिण सीमेपर्यंतच्या उर्वरित 15 जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान हे 12 ते 14 डिग्री से.ग्रेड तर दुपारचे कमाल तापमान 30 डिग्री से. ग्रेड(म्हणजे दोन्हीही तापमाने सरासरीइतके) दरम्यानचे असण्याची शक्यता माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे.


1 ते 8 फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्रातील थंडी


फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिक जिल्हा वगळता उर्वरित महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान सरासरी इतके म्हणजे 14 डिग्री से ग्रेडच्या आसपास राहू शकते. त्यामुळं नेहमीसारखी थंडी पहिल्या आठवड्यात जाणवेल. नाशिक जिल्ह्यात मात्र पहाटेचे किमान तापमान सरासरी तापमानापेक्षा एक ते दिड डिग्रीने अधिक राहून म्हणजे 14 डिग्री से.ग्रेड च्या आसपास राहू शकते. त्यामुळं नेहमीपेक्षा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात काहीशी कमी थंडी नाशिक जिल्ह्यात अनुभवायला मिळेल, अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली. 


थंडी नेमक्या कोणत्या मार्गाने येते?


उत्तर भारतातून  महाराष्ट्राच्या  उत्तरसीमेवर जेथे समुद्रसपाटीपासून कमी उंचीत तयार झालेल्या नैसर्गिक घळ्यातून म्हणजे  मुख्यत: खानदेशातील नंदुरबार, शिरपूर, रावेर  ह्या भागातून तर विदर्भातील गोंदिया, तुमसर, मोहाडी, मार्गे उत्तरेदिशेकडून तसेच गडचिरोलीतील भामरागड, सिरोंचा आणि चंद्रपूर मार्गे ईशान्यकडून महाराष्ट्रात थंडीचा नेहमी प्रवेश होत असतो. अर्थात त्यावेळी महाराष्ट्रातील उच्चं दाब क्षीणता कशी आहे, ह्यावरही थंडी तीव्रता वहनाचे प्रमाण ठरले जाते. 


थंडीचा प्रभाव नेमका कशामुळं? 


संपूर्ण गुजरात राज्य, महाराष्ट्रातील कोकण तसेच खान्देश व नाशिक जिल्ह्यातील क.स.मा.दे. तालुक्यातील क्षेत्रात साधारण ताशी 8 ते 10 किमी. तर उर्वरित महाराष्ट्रात शांत पण ताशी 1 -2 किमी. वेगाने खानदेशातील नंदुरबार, शिरपूर, रावेर  ह्या भागातून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे मध्यम का होईना पण थंडी जाणवत आहे. म्हणून तर सध्या संपूर्ण गुजराथ राज्य व मुंबईसह संपूर्ण कोकणातील 7 जिल्हे थंडावले आहेत. 


खान्देशात धुके


मध्य प्रदेश लगत खान्देशातील शिरपूर शहादा चोपडा यावल रावेर तालुक्याच्या तुरळक भागात सध्या अधून-मधून सकाळच्या वेळी जाणवणारे काहीसे धुके व असेच धुके पुढे काही दिवस टिकून राहण्याची शक्यता जाणवते. हे पडणारे धुके, जमिनीलगत दिड किमी. पर्यंतचा शांत वारा, तसेच तेथील समुद्र सपाटी पासूनची कमी उंचीची भौगोलिक रचना व सध्याच्या वातावरणीय घडामोडी आणि पहाटेच्या किमान तापमाना बरोबर दिवसाच्या कमाल तापमानाचाही सरासरीपेक्षा घसरलेला पारा ह्यामुळेच खान्देशात धुके पडत आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Nashik Weather Update : नाशिक, धुळ्यात हुडहुडी! निफाडला निचांकी तापमान; द्राक्ष बागायतदार चिंतेत