Maharashtra Weather : देशात वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कधी थंडी तर कधी पाऊस पडत आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) काही ठिकाणी तर अवकाळी पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. याचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. दरम्यान उद्यापासून पुढील तीन दिवस हिमाचल प्रदेश, पंजाब आणि राजस्थानमधील बिकानेर, चुरू झुंजनू, हनुमानगड जिल्ह्यात वातावरणात बदल झाला असून, तिथे थंडीची लाट येण्याची शक्यता जेष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे. तर दुसरीकडे पुढच्या तीन दिवसांनतर म्हणजे सोमवारपासून (19 डिसेंबरपासून) महाराष्ट्रासह गुजरातमध्ये थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.


महाराष्ट्रात किमान तापमानात घसरण


राज्यातील वातावरण बदलत आहे. अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. दरम्यान पुढील दोन ते तीन दिवसानंतर म्हणजे  साधारण  सोमवारी  19 डिसेंबरपासून संपूर्ण गुजराथ आणि महाराष्ट्रात किमान तापमानात 3 डिग्रीने हळूहळू घसरण हणार आहे. त्यामुळं थंडीत दिवसागणिक वाढ होण्याची शक्यता असल्याचे खुळे यांनी सांगितले.


राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी


वाशिम जिल्ह्यात रात्री उशिरा पुन्हा अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. सलग दोन दिवसापासून वाशिम जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळं रब्बी पिकांचा धोका वाढला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळं आधीच पीक संकटात आल्यानंतर आता अवकाळी पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळं खरीप पिकानंतर आता रब्बी पिकांचं काय होणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाआहे. या अवकाळी पावसामुळं शेतकरी चिंतेत आहेत. नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर आणि शाहादा परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील कापूस, केळी, मिरची आणि रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्ह्यात दोन दिवसापासून होणाऱ्या अवकाळी पावसामुळं आणि ढगाळ वातावरणामुळं रब्बी हंगामातील ज्वारी आणि हरभऱ्याच्या पिकांना आळीचा धोका निर्माण झाला आहे. 


शेती पिकांना फटका


बुलढाणा जिल्ह्यात तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, कालपासून जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस कोसळत आहे.  यामुळं रब्बीची पीकं धोक्यात येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील खामगाव, नांदुरा, मोताळा तालुक्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. पावसाने कांदा, हरभरा पिकांचं नुकसान झाल्याची माहिती मिळली आहे. हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा जवळा-पांचाळ दिग्रस या गावांच्या शिवारामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. गहू, हरभरा, ज्वारी, तूर यासह अन्य फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच रायगड पालघर या जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Rain : राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा, रब्बी पिकांचं काय होणार? शेतकरी चिंतेत