Maharashtra Weather : राज्यात हवामानात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कुठे थंडीचा (Cold Wave) जोर आहे तर कुठे ढगाळ वातावरण तयार झालं आहे. अशा या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांवर (Agriculture Crop) परिणाम होत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. अशातच आज आणि उद्या (28 आणि 29 जानेवारी) राज्यात विजांच्या कडकडाटासह किरकोळ पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळं थंडीचा प्रभाव काहीसा कमी होण्याची शक्यता जेष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी व्यक्त केली आहे.


मुंबईसह कोकण आणि विदर्भात थंडीचा प्रभाव कायम राहणार 


माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्रातील 10 आणि मराठवाड्यातील सात अशा 17 जिल्ह्यात पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसेच आज आणि उद्या काही ठिकाणी तुरळक पावसाची देखील शक्यता आहे. त्यामुळं मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात थंडीचा प्रवाभ कमी होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईसह कोकण आणि विदर्भात जाणवत असलेला थंडीचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता माणिकारव खुळे यांनी व्यक्त केली आहे. 


थंडीचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, 29 जानेवारीनंतर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. सध्या राज्याच्या बहुतांश भागात थंडीचा कडाका जाणवत आहे. अशातच आता 29 जानेवारीनंतर महाराष्ट्रात थंडीची लाट (Cold Wave) येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 2 फेब्रुवारीपर्यंत ही थंडीची लाट कायम राहणार आहे. हवामान विभागानं  दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेसारखी परिस्थिती असणार आहे. तर मुंबईत किमान तापमान सरासरीपेक्षा कमी होऊ शकते, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आलं होत.  पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता देखील वर्तवली होती. तसेच किमान तापमानात किरकोळ वाढ होईल. परंतु दिवसाच्या तापमानात अंशत: घट होण्याची शक्यता आहे. 


पिकांना फटका बसण्याची शक्यता


महाराष्ट्रात तापमानात सातत्यानं चढ उतार होत आहे. कधी थंडी तर कधी पाऊस पडत आहे. या  हवामानाचा रब्बी हंगामाच्या पिकांवर (Rabi Crop) परिणाम होत आहे. बहुतांश भागात कांदा पिकावर करपा रोगाचा (Karpa) प्रादुर्भाव वाढला असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसेच गहू (Wheat), हरभरा, मका या पिकांना देखील या वातावरणाचा फटका बसणार असून उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खरीप हंगामात आधीच अतिवृष्टी आणि परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या सगळ्या आशा आता रब्बी हंगामातील पिकांवर आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या:


Agriculture News : पावसानंतर आता दाट धुक्याची चादर, पिकांवर रोगराई पडण्याची भीती; बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत