Maharashtra Unseasonal Rain : राज्यावर कोरोना प्रादुर्भावासोबतच अवकाळीचं संकटही घोंगावतंय. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, काल (शनिवारी) राज्यात काही ठिकाणी पहाटेपासूनच हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या.  मुंबईसह ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी पहाटे रिमझिम पाऊस झाला. तर अनेक भागांत गारपीट झाली. त्यामुळे शती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, राज्यात पुढील चार ते पाच दिवस अवकाळी पावसासोबतच गारपिटीची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 7 ते 10 जानेवारीदरम्यान राज्यातील विविध भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर, 9 जानेवारीला विदर्भातील काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


विदर्भासह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पूर्व विदर्भातील काही भागात गारपिटीचा इशारा देखील नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आला आहे.  तसेच पश्चिम विदर्भातील अमरावतीत देखील एक-दोन ठिकाणी गारपिटीचा अंदाज आहे. अवकाळी पावसामुळं बळीराज्याच्या चिंतेत भर पडली असून यापूर्वी झालेल्या अवकाळीनं रबी पिकांना मोठा फटका बसला होता. अशातच आता पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजावर आस्मानी संकट कोसळणार आहे.



अमरावतीत गारपीट 


राज्यात अवकाळीनं पुन्हा हजेरी लावली आहे. अमरावती जिल्ह्यात गारपीटीमुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. सायंकाळी चार ते पाचच्या दरम्यान अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार आणि मोर्शी तालुक्याला पावसानं झोडपलं. तिकडे वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यालाही पावसाचा  तडाखा बसला आहे. या पावसामुळे गहू, तूर, भाजीपाला आदी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.




वर्ध्यातील आष्टी तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसासह गारपीट झाली. त्यामुळे गहू, चणा, संत्रा, तूर, भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. नुकसानाचं सर्वेक्षण महसूल विभाग करणार आहे. तसेच, नंदुरबार जिल्ह्यात हरभरा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. हरभऱ्याला फुलोरो आणि घाटे लागताये मात्र, ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.त्याचप्रमाणे, रात्री बुलढाणा जिल्ह्यात अनेक भागांत मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस पडला. यामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झालाय, मात्र यामुळे शेतकऱ्यांचा तूर काढणीच्या हंगामाला नुकसान पोहचू शकतं. 


वाशिममध्येही अवकाळी पावसासह गारपीट, पिकांना फटका 


हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे वाशिम जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत पाऊस तर कुठे पावसासह गारपीटही झाली आहे. त्यामुळे रब्बी पिकांसह भाजीपाला पिकासह तूर काढणी करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 


दरम्यान, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे गेल्यावर्षी नागरिकांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांवर संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 2021 वर्ष संपता संपता अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. अशातच आता पुन्हा एकदा 2022  सालच्या सुरुवातीला देखील असंच काहीसं चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे. एकामागोमाग एक पश्चिमी चक्रावात येत असल्यानं राज्याला पुन्हा एकदा अवकाळीला सामोरे जावं लागत आहे. राज्यात 7 जानेवारी ते 11 जानेवारी दरम्यान पावसाळी वातावरण बघायला मिळू शकते.  


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह