Maharashtra Unlock : राज्यामध्ये कोरोनाची (Maharashtra Corona Update) आकडेवारी कमी झाल्यानंतर सरकारनं पाच टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल केले होते. मात्र निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर काही दिवसातच कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं समोर येत आहे. सोबतच राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका देखील वाढू लागला आहे. त्यामुळं राज्य सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल केले आहेत. आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात राज्य सरकारनं निर्णय जारी केला आहे.


आता सर्व जिल्हे तिसऱ्या टप्प्याच्या वरच असणार आहेत.  महाराष्ट्र सरकारने 5 टप्प्यांनुसार राज्यातील जिल्ह्यांची विभागणी केली होती. मात्र, आता तिसऱ्या टप्प्याच्या खाली कोणताही जिल्हा नसणार आहे.  काही जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आल्यानंतर निर्बंध अधिक कडक करण्यासंदर्भात राज्य सरकारनं हे पाऊल उचललं आहे.  टप्पा कमी करायचा असेल तर दोन आठवड्याचा ट्रेंड चेक करावा लागणार असल्याची माहिती आहे. गेल्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये नवे कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं निदर्शनास आलं आहे.  


Maharashtra Corona : घाईघाईने निर्बंध शिथिल करू नका, धोका पत्करु नका, मुख्यमंत्री ठाकरेंच्या सूचना


काय आहेत नवे नियम 




  • कोव्हिड-19 चा प्रसार होणार नाही याची काळजी घेत नागरीकांना बंधने सुकर होणे सुनिश्चित करण्याबरोबरच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी खालील विशेष कृती करू शकतील.


    1. लोकजागृतीच्या उपक्रमांद्वारे लसीकरणाचा वेग वाढवणे, पात्र लोकांपैकी किमान 70 टक्के लोकांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावे.


    2. कोव्हिडचा प्रसार रोखण्यासाठी टेस्ट-ट्रॅक-ट्रीट या पद्धतीचा जास्तीत जास्त अवलंब करावा.


    3. कोव्हिडच्या विषाणूचा हवेतून प्रसाराचा गुणधर्म लक्षात घेता हेपा फिल्टर्स किंवा एक्झॉस्ट फॅनचा वापर करून वातानुकूलनाच्या उचित नियमांचे पालन करीत कामकाजाच्या ठिकाणांची व कार्यालयांची सुरक्षितता निश्चित करणे संबंधितांना बंधनकारक करावे.


    4. सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे अपेक्षित चाचण्या आणि आरटी-पीसीआर चाचण्या तसेच इतर चाचण्या मोठ्या प्रमाणावर कराव्यात.


    5. कोव्हिडरोधक वर्तणूक न करणाऱ्यांवर प्रभावीपणे दंडात्मक कारवाई करावी.


    6. गर्दी, जमाव आणि मेळाव्यांना प्रोत्साहन मिळेल असे सोहळे/कार्यक्रम/उपक्रम टाळावेत.


    7. न्याय्य पद्धतीने कन्टेनमेन्ट क्षेत्रे घोषित करावीत जेणेकरून छोट्या क्षेत्रावर, विशेष करून बाधित क्षेत्रावरच बंधने लागू होतील. 


    8. विशेष करून विवाह सोहळे आणि उपाहारगृह, मॉल यासारख्या गर्दीची अधिक शक्यता असलेल्या ठिकाणांची तपासणी करून CAB च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी फिरती पथके नियुक्त करावीत. CAB चे नियम हे बंधने कमी करण्यासाठी अत्यावश्यक आहेत. हे सामाजिक पातळीवर पाळायचे नियम आहेत. सदर नियमांचे पालन न केल्यास नागरीकांना दंड होईल.सदर आदेश मा. राज्यपालांच्या वतीने राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जारी केले आहेत असे परिपत्रक  महसूल,वने,आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन विभागाकडून 25 जून रोजी प्रसिध्दीस देण्यात आले आहे.




डेल्टा प्लसमुळे निर्बंध नाही-आरोग्यमंत्री
डेल्टा प्लसचे राज्यात 21 रुग्ण असून त्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मात्र या व्हेरियंटमुळे कुठलेही निर्बंध लावले जाणार नसल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. दरम्यान तिसऱ्या लाटेसंदर्भात शासन स्तरावर सर्व तयारी झाली असून राज्याचा आरोग्य विभाग यासाठी सज्ज असल्याचे देखील टोपे यांनी म्हटलं आहे. 


डेल्टा प्लसमुळे राज्यात कुठेही निर्बंध लावणार नाही; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून स्पष्ट


घाईघाईने निर्बंध शिथिल करू नका- मुख्यमंत्री ठाकरेंच्या सूचना
मुख्यमंत्र्यांनी काल म्हटलं होतं की, दुसऱ्या लाटेचे शेपूट अजून बाकी आहे. आपण पूर्णपणे त्यातून बाहेर आलेलो नाही. जिल्ह्यांसाठी विविध निर्बंधांच्या पातळ्या ( लेव्हल्स) ठरविल्या असल्या तरी स्थानिक प्रशासनाने  प्रत्यक्ष परिस्थिती पाहून आणि कुठलाही धोका न पत्करता निर्बंधांबाबत निर्णय घ्यायचा आहे. लेव्हल्सचा आधार घेऊन नागरिक मुक्तपणे आरोग्याचे नियम न पाळता सर्व व्यवहार करणार असतील आणि गर्दी करणार असतील तर संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढून परिस्थिती बिघडू शकते. यादृष्टीने आपल्या शहर अथवा जिल्ह्यातील संसर्गाचा नीट अभ्यास करा आणि घाईघाईने व्यवहार खुले करू नका असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले होते.