रत्नागिरी : राज्यात डेल्टा प्लस विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णाचा पहिला मृत्यू रत्नागिरी जिल्ह्यात झाला आहे. 13 जून रोजी 80 वर्षीय आजीचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर आजीला डेल्टा प्लसची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. या बातमीनंतर जिल्हा प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. मृत्यू नेमका कशामुळे झाला हे तपासले जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान, राज्यात कुठेही डेल्टा प्लसमुळे निर्बंध लावणार नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत.


कुठलेही निर्बंध लावले जाणार नाही : आरोग्यमंत्री राजेश टोपे 
डेल्टा प्लस व्हेरियंट असलेल्या रत्नागिरीच्या 80 वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. मात्र, सदर महिलेला इतर आजार आणि वय लक्षात घेता हा मृत्यू केवळ डेल्टाच्या संक्रमानाने झाला असे अजिबात म्हणता येणार नसल्याचं देखील टोपे म्हणालेत. डेल्टा प्लसचे राज्यात असलेल्या 21 रुग्णापैकी 20 जणांना डिस्चार्ज दिला आहे. डेल्टा प्लसचे प्रमाण नगण्य असून खबरदारी म्हणून याचे प्रत्येक जिल्ह्यातुन डेल्टा प्लस साठी 100 सॅम्पल गोळा करून त्याची तपासणी करण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितले. सध्या डेल्टा प्लसमुळे कुठलेही चिंतेचे कारण नसून त्यामुळे राज्यात कुठेही निर्बंध लावले जाणार नसल्याचे देखील आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.


मृत्यू नेमका कशामुळे झाला हे तपासले जाणार : जिल्हाधिकारी
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमधील 80 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. डेल्टा प्लसने मृत्यू झालेल्या महिलेला इतरही आजार होते. त्यामुळे मृत्यू नेमका कशामुळे झाला हे तपासले जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. डेल्टा प्लॅस व्हेरिएंटचे रूग्णांची रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नऊ संख्या असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यानंतर जिल्ह्यातील निर्बंध शिथिल होणार का कडक होणार? याबाबतच चर्चा सुरू झाली आहे. याचवेळी आता रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर बाजारपेठेतील व्यापारी आक्रमक झाले असून त्यांनी थेट जिल्हा परिषद सीईओ डॉक्टर इंदूराणी जाखड आणि तहसीलदारांची गाडी अडवत त्यांना जाब विचारला होता. 



कोरोना संदर्भात आता सर्व जिल्हे तिसऱ्या टप्प्याच्या वरच..



  • सरकारनं नियमावलीत महत्त्वपूर्ण बदल जारी केले आहेत. महाराष्ट्र सरकारने 5 टप्प्यांनुसार राज्यातील जिल्ह्यांची विभागणी केली होती. मात्र, आता तिसऱ्या टप्प्याच्या खाली कोणताही जिल्हा नसणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आल्यानंतर निर्बंध अधिक कडक करण्यासंदर्भात राज्य सरकारने निर्णय.

  • टप्पा कमी करायचा असेल तर दोन आठवड्याचा ट्रेंड चेक करावा लागणार.

  • गेल्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये नवे करोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं निदर्शनास.
    यानुसार राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.