मुंबई : कोल्हापूर, सांगलीसहित राज्यात हजारो लोक पुराच्या विळख्यात असताना सरकारने पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला खरा, परंतु हा हात तोकडा पडत असल्याचं दिसत आहे. कारण या मदतीद्वारे सरकारने पूरग्रस्तांची एकप्रकारे थट्टाच केली आहे.  पूरग्रस्ताचं क्षेत्र दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस पाण्यात बुडालं असेल तरच मोफत अन्नधान्य (10 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ) देणार, असा जीआर सरकारच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने 7 ऑगस्ट रोजी जारी केला आहे.


एकीकडे लोक पाण्यात असताना, अडचणीत असताना या अटी आणि शर्तींमुळे सरकार राज्यातील पूरग्रस्तांची थट्टा करण्यात धन्यता मानत आहे. मात्र, हा केवळ उल्लेख असून, पुरात अडकलेल्या लोकांना सर्व मदत पोहोचवण्याचं काम आधिच सुरु झाल्याचं सरकारनं म्हटलं आहे.

तसेच आघाडी सरकारच्या काळात हीच मर्यादा 7 दिवसांची होती आणि ती या सरकारनं दोन दिवसांवर आणल्याचंही सरकारनं म्हटलंय. दरम्यान दिली जाणारी मदतही वाढवल्याचा सरकारचा दावा आहे.



चार दिवस कुठे होता? सांगलीत पाहणीसाठी गेलेल्या महाजन आणि देशमुखांना पूरग्रस्तांनी घेरलं

राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांना सांगलीतील पूरग्रस्तांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेले असताना दोन्ही मंत्र्यांना स्थानिकांनी घेरलं. तुम्ही चार दिवस कुठे होता? प्रशासनाने मदत पोहोचवण्यास उशीर का केला, असा सवाल त्यांनी विचारला.

"तुम्ही यात्रा काढत आहात, तुमची यंत्रणा चुकीची आहे, आम्हाला यांची मदत नको, आम्ही सक्षम आहोत," अशी उद्विग्न प्रतिक्रियाही ग्रामस्थांनी दिली आहे.



सेल्फी व्हिडीओमध्ये गिरीश महाजन यांची हसून दाद

दरम्यान, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काल (8 ऑगस्ट) कोल्हापूरमधील पूरपरिस्थितीचा बोटीतून आढावा घेतला. परंतु यावेळी कार्यकर्त्याने काढलेल्या सेल्फी व्हिडीओला गिरीश महाजन यांनी हसून दाद देताना दिसत आहे. त्यामुळे हजारो-लाखो लोक पुरात अडकले असताना मंत्री आनंदात आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे.