मुंबई : काँग्रेसकडून गेली साडेचार वर्ष विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावणारे राधाकृष्ण विखे पाटील आता सरकारमध्ये मंत्री झाले आहेत. त्यांच्या सत्तेत सहभागी होण्याने विधानसभा विरोधी पक्षनेत्याविना आहे.


उद्यापासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनात विरोधी पक्षनेते म्हणून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.  विजय वडेट्टीवार यांची पक्षाने नुकतीच  गटनेतेपदी निवड केली आहे.

याबाबत राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांनी सूतोवाच केले आहे. अधिवेशन सुरु होत असताना वरच्या सभागृहात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे जनतेचे विषय मांडतीलच शिवाय आम्ही खालच्या सभागृहात आवाज उठवणार आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे विरोधी पक्षनेते म्हणून विजय वडेट्टीवार यांची नेमणूक करावी अशी मागणी करणार आहोत अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

विरोधी पक्षनेत्यांना फोडण्याचे काम केले जात आहे. कुठल्या रस्त्याने हे लोक घेवून जात आहे. लोकशाहीत हे योग्य आहे का? या सरकारने तारतम्य ठेवले नाही असा आरोप अजित पवार यांनी विरोधी पक्षाच्या पत्रकार परिषदेत केला.

लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष टिकला पाहिजे परंतु यालाच गालबोट लावण्याचे काम या सरकारकडून केले गेले आहे अशी जोरदार टिकाही पवार यांनी केली.

यावेळी कॉंग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात, गटनेते विजय वडेट्टीवार यांनीही भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आणि येत्या अधिवेशनात जनतेच्या प्रश्नावर सरकारला सळो की पळो करून सोडणार असल्याचे सांगितले.



सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
या सरकारने पाच वर्षांत ठोस काम केलेले नाही. फडणवीसांचे हे आभासी सरकार आहे असा करत विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक झाल्यावर पत्रकार परिषद झाली.  जनतेचे प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी ठरले असून त्यामुळे आम्ही चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली.

अधिवेशनात 28 विधेयक चर्चेला येणार
मुख्यमंत्री  फडणवीस  म्हणाले की, उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात 13 नवीन विधेयक आणि विधान सभेतील प्रलंबित 12, विधान परिषदेतील प्रलंबित 3 अशी एकूण 28 विधेयक चर्चेला येणार आहेत. राज्यात दुष्काळ परिस्थिती असल्याने अधिवेशनात दुष्काळावर चर्चा करण्यात येईल.  आतापर्यंत शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर 4 हजार 700 कोटी रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे. तसेच 3 हजार 200 कोटी रुपयांचा पिकविमा वितरित करणे सुरू आहे. प्रधानमंत्री किसान योजनेत राज्यातील 1 कोटी 20 लाख शेतकऱ्यांचा समावेश असेल. त्यांची माहिती अद्ययावत करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. त्यांच्या खात्यातही खरिपापूर्वी रक्कम जमा होणार आहे, असे ते म्हणाले.