मुंबई : सीबीएसईने 30 टक्के अभ्यासक्रम कमी केल्यानंतर आता राज्य शिक्षण मंडळाने सुद्धा कमी करावा अशी मागणी पालक, शिक्षकांकडून केली जात होती. या मागणीचा गांभीर्याने विचार करत आता शिक्षण विभागानेही पहिली ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम 25 टक्के कपात करून विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. एकीकडे शाळा बंद आहेत, तरी शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू करण्यात आले. ऑनलाइन माध्यमातून हे शिक्षण देत असताना त्याला सुद्धा काही मर्यादा आहेत. त्यात अभ्यासक्रम पूर्ण कसा होईल, याबाबत प्रश्न विद्यार्थी शिक्षकांना पडलेला पाहायला मिळत होता.


आता अभ्यासक्रम कमी केल्याने विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा नक्कीच मिळणार आहे. कारण दहावी आणि बारावी बोर्डाचा अभ्यास करताना अभयसक्रम लवकर संपवण्याचा प्रयत्न असतो. त्यात आता अभ्यासक्रम कमी केल्याने वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य होईल. अभ्यासक्रमाची यादी संचालक, राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे.


CBSE Board Syllabus Reduced | सीबीएसई बोर्डाचा नववी ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम 30% कमी


राज्यात आणि देशात कोरोनाचं संकट असताना देखील आपण शैक्षणिक वर्ष 2020-21 15 जून रोजी सुरु केलं. राज्यात प्रत्यक्ष सुरु करणे शक्य नसले, तरी विविध माध्यमातून शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. शाळा अद्याप सुरु न झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात तणाव किंवा दडपण येऊ नये, यासाठी पहिली ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम कमी करण्याच्या निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे, असं राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.


101 विषयांचा 25 टक्के पाठ्यक्रम कमी


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र , महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ( बालभारती ) आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ( बोर्ड ) यांच्या समन्वयाने आणि अभ्यासक्रम समितीच्या निर्णयानुसार संबंधित विषयाचे सर्व अभ्यासक्रम मंडळ सदस्यांमार्फत शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी अभ्यासक्रमाचा मूळ गाभा तसाच ठेवून प्राथमिक स्तरावरील 22, माध्यमिक स्तरावरील 20 आणि उच्च माध्यमिक स्तरावरील 53 असे एकूण 101 विषयांचा इयत्ता निहाय, विषय निहाय 25 टक्के पाठ्यक्रम कमी करण्यात आला आहे.


- पाठ्यक्रमातून 25 टक्के भाग वगळत असताना भाषा विषयामध्ये काही गद्य व पद्य पाठ व त्यावर आधारित स्वाध्याय कृती वगळण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी अंतर्गत मूल्यमापन आणि वार्षिक परीक्षा यामध्ये या घटकांवर कोणत्याही कृती विचारल्या जावू नयेत.
- भाषा विषयामध्ये वगळण्यात आलेल्या पाठाला जोडून आलेले व्याकरण किंवा इतर भाषिक कौशल्य वगळण्यात आलेली नाहीत.
- इतर विषयामध्ये कृतीची पुनरावृत्ती टाळणे तसेच काही भाग विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी देण्यात आला आहे.
- शालेय श्रेणी विषयासंदर्भात परिस्थिती व त्यानुसार उपलब्ध सोयी सुविधा यांचा विचार करून उपक्रम / प्रकल्प घेण्याबाबत सूचित केले आहे.
- प्रात्यक्षिकांवर आधारित विषयांचे प्रात्यक्षिक कार्य हे अध्ययन-अध्यापन संदर्भाने विचारात घेतलेल्या आशयास अनुसरूनच उपलब्ध परिस्थिती व सोयी सुविधा विचारात घेवून पूर्ण करणेबाबत सूचित केले आहे.
- राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या मार्फत शैक्षणिक दिनदर्शिकेची निर्मिती केली आहे. त्या दिनदर्शिकेमधून पाठ्यक्रमातून कमी करण्यात आलेला भाग वगळण्यात येत आहे.
- इयत्ता पहिली ते बारावीचा इयत्ता निहाय, विषय निहाय 25 टक्के पाठ्यक्रम कमी करण्यात आलेला भाग www.maa.ac.in आणि www.ebalbharati.in या वेबसाईट वर प्रकाशित करण्यात येत आहे.
- शाळा प्रमुखांमार्फत शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी सदर पाठ्यक्रम वगळल्याची नोंद घेवून त्याबाबत सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना अवगत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.