Maharashtra Rain Updates : गेल्या दोन दिवसांपासून मुंबई (Mumbai) कोकणासह (Konkan) पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसानं धुमाकूळ घातला आहे.  कोकणासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. मुसळधार ते अती मुसळधार पाऊस बरसणार असल्यानं प्रशासन सतर्क झालं आहे. नदीकाठच्या नागरिकांनाही सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढील चार दिवसांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी , सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापुरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. 


दरम्यान सातारा जिल्ह्यात (Satara Rain) पावसानं धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यातील वाई तालुक्यातील जोर गावात गेल्या 24 तासात 321 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. गावात सर्व प्रशासकीय यंत्रणा जाऊन पाहणी करुन आल्या आहेत. विशेष जोर गावात म्हणजे गेल्यावर्षी 900 मिलिमीटर पावसाची नोंद एकाच दिवशी झाली होती.  गावाच्याजवळ बलकवडी धरण आहे. गावातील भूस्खलन होणाऱ्या डोंगराजवळील 26 कुटुंबाचे स्थलांतर केले आहे तर दोन गरोदर महिलांचेही या भागातून स्थलांतर केले आहे. 


गेल्या वर्षीच्या एका दिवसाच्या पावसात आई आणि बाळ वाहून गेले होते. आजपर्यंत ते आई आणि बाळ सापडले नाही. त्यांना प्रशासकीय यंत्रणेने मृत घोषित केले आहे. या गावात भूशास्त्र टीम काही दिवसांपूर्वी येऊन पाहणी करुन गेली होती.


प्रतापगडाच्या पायथ्याच्या पार गावात पाणी


प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या पार गावात पाणी घुसू लागले आहे.  तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या सरींमुळे प्रतापगडाच्या पंचक्रोशीत भागातील गावागावात आता पाणी घुसू लागल्याचे दिसू लागले आहे. महाबळेश्वर तालुक्यातील पार या गावातील ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. आता या ओढ्या नाल्यांचे पाणी गावात घुसू लागले आहे. गेल्या वर्षी पाऊस झाला त्यावेळेला हेच पार गाव तब्बल पंधरा दिवस संपर्कहीन होते.  


इतर महत्वाच्या बातम्या


Maharashtra Rain Updates : राज्यभरात पावसाची कोसळधार; कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती?