Maharashtra Rain : राज्यात सध्या तुरळक ठिकाणी पाऊस (Rain) पडत आहे. बहुतांश जिल्ह्यात पावसानं दडी मारली आहे. त्यामुळं बळीराजा चिंतेत आहे. राज्यातील पेरणीसाठी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत. मात्र, पावसानं चांगलीच ओढ दिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान राज्यातील कोकणासह मुंबई उपनगर ठाणे या परिसरात चांगला पाऊस पडत आहे. तसेच विदर्भातील काही जिल्ह्यातही पावसानं चांगली हजेरी लावली आहे. अन्य ठिकाणी मात्र म्हणावा तसा पाऊस झाला नाही. दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यातील काही भागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मध्य महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मराठवाडा आण विदर्भातह पावसाटा यलो अलर्ट देण्यात आा आहे. त्याचबरोबर कोकणातही यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. दरम्यान, राज्यातील काही भागात पावसानं चांगली हजेरी लावली आहे. 


अकोल्यात जोरदार पाऊस, चिमुकला गेल्या ओढ्याच्या पाण्यात वाहून 


अकोल्यात रात्री धुवांधार पाऊस झाला आहे. या पावसात खैरमोहम्मद प्लॉट भागातील एक चिमुकला ओढ्याच्या पुरात वाहून गेला आहे. जियान अहमद एकबाल अहमद असं या वाहून गेलेल्या चिमुकल्याचं नाव आहे. ओढ्याचं पाणी काहीसं वाढल्यानंतर तिथे लहान मुले खेळत होती. त्याचवेळी खेळताना जियान वाहून गेला आहे. त्याचा शोध मध्यरात्री उशिरापर्यंत बचावपथकाकडून सुरू होता. 


वाशिमच्या रिसोड तालुक्यात मुसळधार पाऊस


वाशिमच्या रिसोड तालुक्यात आज अनेक भागात  मुसळधार  पाऊस झाला आहे. तर  कोयाळी परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळल्यानं परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यामध्ये नुकतीच खरिपाची पेरणी केलेलं सोयाबीन पीक आणि गेल्या महिन्यात लागवड केलेल्या हळदीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.  त्यामुळे शेतकऱ्यांचं कंबरड मोडलं आहे. आधीच उशिरा पाऊस झाल्याने  पेरणी उशिरा झाली होती. त्यामुळं खरिपाच उत्पन्न घटते की काय अशी चिंता सतावत असतानाच आता ढगफुटीसदृश्य पाऊस पडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेच वातावरण आहे.


अहमदनगर जिल्ह्यात दुबार पेरणीचं संकट


अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये पावसाने ओढ दिल्याने दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता आहे. बागायत भागामध्ये शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. मात्र दक्षिण नगर जिल्ह्यातील जिरायत पट्ट्यामध्ये अद्यापही अनेक ठिकाणी पेरणी खोळंबली आहे. नगर तालुक्यातील वाळकी आणि खडकी भागातील फळबागांची होरपळ सुरु झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी फळबागा वाचवण्यासाठी टॅंकरने पाणीपुरवठा केला आहे, मात्र तरी देखील फळबागा वाचू शकल्या नाहीत.