Maharashtra Rain Updates : राज्यभर पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांच्या (Maharashtra Flood) आणि धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. आजही मुंबईसह अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळं राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. काही धरणं, तलाव ओव्हरफ्लो झाली आहेत तर काही ठिकाणी वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा झाला आहे. धरणांतील पाणीसाठा वाढल्याने नक्कीच दिलासादायक गोष्ट म्हणावी लागेल. 


Mumbai Water Dam: मागील काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचं पाणी कपातीचं टेन्शन संपलं आहे. पुढील वर्षांपर्यंत पुरेल इतका पाणीसाठी मुंबईजवळील तलावात साठला आहे. पुढच्या वर्षापर्यंत मुंबईला पाणीकपातीची चिंता नाही. कारण मुंबईच्या तलावांत 50 % पेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. हा पाणीसाठा पुढील 189 दिवस इतका म्हणजे पुढील 16 जानेवारी 2023 पर्यंत पुरेल इतका आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावात गेल्या 18 दिवसांत मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे तलावातील पाणीसाठ्यात 5,86,899 दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची वाढ झाली आहे. मुंबईतील 10 टक्के पाणीकपातही रद्द झाली. 


पुण्यात (Pune) संततधार पावसामुळे खडकवासला धरणात (Khadakwasla Dam) क्षमतेच्या 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. पावसाचा अंदाज लक्षात घेऊन 11 तारखेच्या मध्यरात्रीपासून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. सुरुवातीला सुमारे 1000 क्युसेक पाणी सोडण्यात येत होते.  


अहमदनगरमधील भंडारदरा आणि निळवंडे (Bhandardara and Nilwande Dam) दोन्ही धरण 50 टक्के भरली आहेत. तर अहमदनगर जिल्ह्यातील अनेक छोटी धरण ओव्हरफ्लो झाले आहेत.


धुळ्याला पाणीपुरवठा करणाऱ्या अक्कलपाडा धरणातील (Nandurbar Akkalpada Dam) पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.


संततधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील वाघाड धरण (Waghad Dam Nashik) ओव्हरफ्लो झालं आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वाघाडी पाठोपाठ दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड (ozarkhed dam) धरण ओव्हरफलो झालं आहे. 
 
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 48 तासांत मुसळधार पाऊस झाला आहे. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक्र धरणातील (Nandurbar VeerChakra Dam) पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.


सांगलीच्या कृष्णा नदीची पाणीपातळी वाढल्याने चांदोली धरण (Chandoli Dam) पन्नास टक्क्यांहून अधिक भरलं आहे.  तिकडे विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यातील इरई धरणाचे (Chandrapur Irai Dam) 4 दरवाजे उघडण्यात आले आहेत.