Maharashtra Rains : येत्या 3 दिवसात राज्यात मध्यम ते मुसळधार (Rain Update) पावसाची शक्यता आहे.  पुढचे 3 दिवस राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर (Weather Update) वाढेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.  विदर्भातील काही भागात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. विदर्भात (Vidarbha Rains) काही जिल्ह्यांत पूरस्थिती होती.  राज्याच्या विविध भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतली होती. त्यामुळे गडचिरोली, चंद्रपूर या भागातील नद्यांची पाणी पातळी घटली असून पूरही ओसरला आहे. मात्र आता पुन्हा एकदा हवामान खात्याने विदर्भाची चिंता वाढवलीय. विदर्भात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. याशिवाय मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. 

  
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुन्हा पावसाला सुरुवात
मागील आठ दिवसापासून गायब असलेल्या पावसानं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा बरसायला सुरुवात केली आहे.  रात्रीपासून जिल्ह्याचा अनेक भागांमध्ये सरींवरती पाऊस बरसत आहे. कोसळणाऱ्या सरी या जोरदार अशाच आहेत. सध्या देखील जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे.  खेडमधील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. रात्री उशिरा जिल्हा माहिती कार्यालयाने जगबुडीबाबत दिलेली माहिती आहे. पाऊस पडत असला तरी जिल्ह्याच्या जनजीवनावरती मात्र कोणताही मोठा परिणाम झालेला नाही.


एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या 14 तुकड्या तैनात
राज्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून पूर परिस्थीती बाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या 14 तुकड्या तैनात केल्या आहेत. मुंबई (कांजूरमार्ग-1, घाटकोपर-1) -2, पालघर -1,रायगड- महाड- 2, ठाणे-2,रत्नागिरी-चिपळूण-2,कोल्हापूर-2,सातारा-1,  राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण 12 टीम तैनात आहेत. नांदेड-1, गडचिरोली-1 अशा एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ)  च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.


अतिवृष्टीमुळे 28 जिल्हे आणि 309 गावे प्रभावित


राज्यात एक जून पासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे 28 जिल्हे आणि 309 गावे प्रभावित झाली असून 83 तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली आहेत. आतापर्यंत 14  हजार 480 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे 110 नगरिकांनी  आपला जीव गमावला आहे तर 218 प्राणी दगावले आहेत. 44 घरांचे पूर्णत: तर 2 हजार 86 घरांचे अशंत: नुकसान झालेले आहे.