Maharashtra Politics:  राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली कटुता संपवा अशी साद शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र 'सामना'तून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घालण्यात आली आहे. राज्याच्या राजकारणात कटुता निर्माण झाल्याचं वक्तव्य फडणवीस यांनी केलं होते. त्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र सामनातून फडणवीस यांना कटुता संपवण्यासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे. मात्र, 'सामना'तून करण्यात आलेले आवाहन हे खरोखर आवाहन केले की फडणवीस यांच्यावर तिरकस टीका केली, यावरून चर्चा सुरू झाल्या आहेत. शिंदे गटावरही सामनातून निशाणा साधण्यात आला आहे. 


शिवसेना ठाकरे गटाने 'सामना'त म्हटले की, फडणवीस यांचा मूळ स्वभाव हा सामोपचाराने मिळून मिसळून वागण्याचाच होता. पण सत्ता गेल्यामुळे ते बिघडले. सत्ता येते व जाते. माणसाने मूळ स्वभाव बदलण्याची गरज नाही. विजयानंतर आनंद होत असला तरी उन्माद चढणे हे प्रौढत्वाचे लक्षण मानले जात नाही. फडणवीस यांच्यात नव्या सत्तांतरापासून प्रौढपणा आला असल्याचे जाणवू लागले आहे. दिवाळीनिमित्त फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला व काही विषयांवर ते मोकळेपणाने बोलल्याचे प्रसिद्ध झाले. फडणवीस यांनी दोन महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यावर महाराष्ट्राने विचार करायला हवा.महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे एवढी कटुता आली आहे, हे नाकारता येणार नाही, असे फडणवीस यांनी कबूल केले असे शिवसेनेने म्हटले. 


महाराष्ट्राच्या राजकारणात फक्त कटुता नव्हे तर सूडाच्या राजकारणाचे विषारी प्रवाह उसळत आहेत व या प्रवाहाचे मूळ भाजपच्या अलीकडच्या राजकारणात आहे. पण त्याबाबत फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांना आता खंत वाटू लागली असेल तर त्या विषाचे अमृत करण्याचे कामही त्यांनाच करावे लागेल, असेही 'सामना'ने म्हटले.


महाराष्ट्रातील राजकारणात कटुता राहू नये व राज्याच्या कल्याणासाठी सगळय़ांनी एकत्र बसले पाहिजे हीच राज्याची परंपरा आहे. बेरजेचे राजकारण हीच महाराष्ट्राची परंपरा आहे. यशवंतराव चव्हाण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शरद पवार अशा नेत्यांनी हे बेरजेचे राजकारण केले, ते मोडले कोणी? राजकारणात व्यक्तिगत चिखलफेक करताना कोणतेही धरबंध आता बाळगले जात नाहीत व त्यासाठी भाजपने काही भुंकणाऱ्या कुत्र्यांना प्रशिक्षण दिले आहे. ते शरद पवारांपासून, ठाकऱ्यांपर्यंत ज्या भाषेचा वापर करतात त्यामुळे राज्याच्या राजकारणातील कटुता कशी कमी होईल? असा सवालही शिवसेना ठाकरे गटाने उपस्थित केला. 


तुम्ही केंद्रीय सत्तेचा गैरवापर करून सरकार पाडले. शिवसेना फोडलीत. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले जावे यासाठी पडद्यामागून राजकीय सूत्रे हलवली गेली, हे सर्व महाराष्ट्राने आणि देशाने पाहिले. शिवसेना राहता कामा नये व शिवसेनेतून जे विष बाहेर पडलेय त्या विषाला ‘बासुंदी’चा दर्जा देण्याचा सध्या जो अचाट प्रयत्न सुरू आहे त्यामुळे कटुतेची धार कशी कमी होणार? असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला. 


सोबत असलेले भाजपच्या गळ्यातील धोंडा


शिवसेनेच्या दसरा मेळाव्यास विरोध करणे ही भूमिका इतर कोणी घेतली तर त्यास मान्यता असूच शकत नाही, पण फडणवीस यांच्यासारख्या शहाण्याने तशी भूमिका घेणे महाराष्ट्राच्या परंपरेस शोभणारे नव्हते. खरी शिवसेना कोणती? हे फडणवीसांना पक्के माहीत आहे व त्यांनी गळ्यात जो ‘खरी शिवसेना’ म्हणून धोंडा बांधून घेतला आहे तो महाराष्ट्राला घेऊन बुडणार आहे, हे समजण्याइतके फडणवीस सुज्ञ आहेत, असा टोलाही सामनातून लगावला आहे. पण त्यांचे शहाणपण कोठेतरी भरकटल्यासारखे झाले आहे. 


...तर फडणवीस आज वर्षावर असते


'सामना'च्या अग्रलेखात म्हटले की, फडणवीस यांनी फराळाची चकली तोडताना आणखी एक काडी टाकली. ते त्यांच्या प्रगल्भतेवर शंका घेणारे आहे. फडणवीस म्हणतात, ‘उद्धव ठाकरे यांचा युती तोडण्याचा निर्णय पूर्वनियोजित होता.’ फडणवीस यांनी हे विधान कशाच्या आधारावर केले? शिवसेनेस शब्द देऊन अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद नाकारले येथेच कटुतेची ठिणगी पडली. प्रश्न असा आहे की, शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यायचा शब्दच नव्हता हे पक्के ठरले होते ना? मग आता फुटलेल्या ‘मिंधे’ गटास मुख्यमंत्रीपद देऊन ‘‘आम्ही मुख्यमंत्रीपदाचा शब्द पाळला बरं का?’’ अशा चिपळय़ा वाजवायचे कारण काय? हेच मुख्यमंत्रीपद आधी दिले असते तर राज्यात कटुता निर्माण झाली नसती व फडणवीस यांनाही खंत वगैरे वाटण्याचा प्रश्नच नव्हता. अर्थात राज्यात कटुता आहे व ती दूर केली पाहिजे हा विचार देवेंद्र फडणवीस यांच्या मनात येणे हे महत्त्वाचे. फडणवीस हे ‘सागर’ बंगल्यावर खूश आहेत. गेल्यावेळी भाजपने शब्द पाळला असता तर तेच आज ‘वर्षा’वर असते व आम्ही एका नात्याने त्यांच्याकडे फराळास गेलो असतो, असेही सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.