मुंबई: गुरुवारपासून शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सुरु होणार असून सर्वोच्च न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणाचा निकाल जवळपास लिहून दिला आहे, आता फक्त सुनावणीसाठी अध्यक्षांकडे पाठवला आहे. त्यामुळे लवकरच याचा निकाल लागेल असे शिवसेना नेते अनिल परब यांनी सांगितले. हे 16 आमदार अपात्र ठरणार असून सरकार वाचवण्यासाठीच भाजपने राष्ट्रवादी फोडल्याचा आरोप त्यांनी केला. 


अनिल परब आज पंढरपूरला दर्शनासाठी आले असता ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्वे घालून दिली असून पूर्णपणे अर्थ लावूनच पाठवले आहेत. आता फक्त निर्णय घेणे बाकी आहे. सध्या हे सरकार वेळ काढण्याचा प्रयत्न करीत असले तरी सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांची भूमिका, घटनेतील 10 वे कलम  या सर्व बाबतीत  सांगितले असल्याने पक्षांतर्गत बंदी बाबत सर्व असलेले नियम आता स्पष्ट आहेत. यामुळे सध्या सरकार वाचवण्यासाठी वेळ काढूपणा सुरु असून हे 16 आमदार अपात्र होणे म्हणजे सरकार जाणे आहे. या 16 आमदारांमध्ये मुख्यमंत्री असून यापाठोपाठ इतर 23 आमदारांचे पिटिशन देखील बाकी असल्याने हा वेळकाढूपणा सुरु आहे.


आता सरकार वाचवण्यासाठी म्हणूनच राष्ट्रवादीतील लोकांचा पाठिंबा घेतला असावा असे अनिल परब म्हणाले. आमच्याप्रमाणे राष्ट्रवादीनेही आता अपात्रतेसंदर्भात कारवाई सुरु केली असल्याचे परब यांनी सांगितले. सध्या उद्धव ठाकरे यांच्यावर सुरु असलेली टीका या ज्याच्या त्याच्या लायकीप्रमाणे सुरु असून असे बोलण्यानेच त्यांचे त्यांच्या पक्षातील स्थान असल्याचा टोलाही अनिल परब यांनी राणे आणि वाघ याना लगावला. 
    
मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मराठा आरक्षणासाठी नव्हते तर मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी दाखल देण्यासाठी असल्याचे परब म्हणाले. मराठवाड्यातील मराठा समाजाला वंशावळ न पाहता सरसकट कुणबी दाखले मिळावे अशी त्यांनी मागणी केली आहे असं परब यांनी सांगितलं.


सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक  मागासलेपण सिद्ध झाल्याशिवाय मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळणार नाही. यासाठी योग्य इम्परिकल डाटा मागास आयोगाने देणे गरजेचे असल्याचे अनिल परब यांनी सांगितलं. सध्या कुणबी विरुद्ध मराठा, मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण होत असून सामाजिक वातावरण खराब होऊ लागल्याने यात राजकारण न करता प्रश्न सोडवावा अशी अपेक्षा परब यांनी व्यक्त केली.  


ही बातमी वाचा: