Raj Thackeray : राज्यात झालेल्या सत्तानाट्यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शरद पवारांवर (Sharad pawar) हल्लाबोल केला आहे. राज्यात जे काही झालं ते किळसवाणं आहे. राज्यात घाणेरड्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनीच केली असल्याचं ते म्हणाले. ते पुण्यात बोलत होते. जनमताचा कौल तुम्ही घेतला  तर प्रत्येक घरामध्ये शिव्या ऐकायला येतील दुसरे काही ऐकायला येणार नाही, असं म्हणत त्यांनी राज्यातील सत्तानाट्यावर संताप व्यक्त केला आहे.


'प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ ही माणसं अजित पवारांसोबत जाणारी नाहीत'


'हे सगळं शरद पवारांनीच घडवून आणलं असल्याची शंका आहे. त्यात महत्वाचं म्हणजे प्रफुल्ल पटेल (Praful Patel), दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) ही माणसं अजित पवारांसोबत जाणारी नाहीत. त्यामुळे ही तीन माणसं या सत्तानाट्यात संशयास्पद वाटतात. त्यात अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले होते की, सगळ्या होर्डिंग्ज् शरद पवारांचे फोटो लावा. त्यामुळे हे सगळं अनाकलनीय असल्याचं ते म्हणाले. 'हे सत्तानाट्य अचानक घडलं नाही. याची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु होती. त्यात काल ती सगळ्या महाराष्ट्रासमोर आली',असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 'या सत्तानाट्यावर बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे मेळाव्यात या सगळ्या गोष्टी मी स्पष्ट करेन', असंही ते म्हणाले. 


'घड्याळाने काटा काढला की काट्याने घड्याळ काढलं?'


अजित पवारांनी केलेल्या बंडामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. त्यानंतर महाराष्ट्रात कोण कोणत्या पक्षात आहे याचं उत्तरच देता येत नाही आहे. फक्त मनसेचेच कार्यकर्ते ठामपणे सांगू शकतात की, मी मनसेचा आहे. बाकी पक्षात तर फुट पडल्याने कोण कोणत्या पक्षाचं आहे हे सांगता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची दुर्दैवी परिस्थिती आहे, असं म्हणत त्यांनी राज्याच्या राजकारणावर भाष्य केलं आहे. या संपूर्ण राजकारणात शरद पवार बरोबर आहेत की अजित पवार बरोबर आहेत, हे सांगता येत नाही. काकाने पुतण्याकडे लक्ष दिलं की पुतण्याने काकाकडे लक्ष दिलंं हे माहित नाही. मात्र घड्याळाने काटा काढला की काट्याने घड्याळ काढलं यासंदर्भात काहीही बोलता येत नाही , असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 


 


इतर महत्वाच्या बातम्या: