Maharashtra Politics:  राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला असून त्यामुळेच ते त्यांच्यासोबत असल्याची खोचक टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रखेखर बावनकुळे यांनी केली आहे. या जादूटोण्यामुळे उद्धव ठाकरे त्यांच्यासारखा विचार करू लागला असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले. बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे. 


भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज सातारा दौऱ्यावर आहेत. त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. बावनकुळे यांनी म्हटले की, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आता सत्तेचे स्वप्न सोडून द्यावे, त्यांना अजूनही सत्तेत येऊ असे वाटत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बेईमानी करून सत्ता स्थापन करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.


उद्धव ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने एक प्रकारचा जादूटोणा केला. त्यात उद्धव ठाकरे अडकले. त्यातूनच त्यांनी राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही आता सतर्क असून सरकार पुन्हा निवडून आणू असेही बावनकुळे यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात 200 हून आमदार निवडून आणणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या पक्षातील भोंदूबाबाच्या ताब्यात कोणं आलं तर तो सुटत नाही असं सांगितले. भोंदूबाबा कोण आहे हे सगळ्यांना माहीत आहे. पुन्हा ते सांगण्याची गरज नाही असे म्हणत एकदा शरद पवारांच्या ताब्यात कोणी आला तर तो सुटत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. 


बावनकुळेंच्या वक्तव्याचा निषेध


एका बाजूला राजकारणातील कटुता संपवायची आहे असं म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूला जर भाजपचे नेते अशी वक्तव्ये करत असतील तर त्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचे टीका शिवसेनेचे आमदार भास्करराव जाधव यांनी केली. तर, दुसरीकडे अंधश्रद्धा व जादूटोणाविरोधी कायदा ज्यांच्यामुळे संमत झाला त्या डॉ.नरेंद्र दाभोळकरांच्या साताऱ्यात भाजप प्रदेशाध्यक्षांची जादूटोण्याची भाषा पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी आणि महाराष्ट्राचा व या कायद्याचा अवमान करणारी आहे. शिवाय जादूटोणाविरोधी कायद्यालाच हे आव्हान असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी म्हटले आहे.