Maharashtra Politics : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सगळ्यांचे लक्ष नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर लागले आहे. या नव्या सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम 12 किंवा 13 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर काही दिवसानंतर विधीमंडळाचे अधिवेशन होणार आहे. त्यामुळे या अधिवेशनाच्या आधीच नवीन मंत्री आपला पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसात खाते वाटपावर चर्चा होणार असल्याची शक्यता आहे. 


शिवसेनेत आतापर्यंतची सर्वात मोठी बंडाळी झाली आहे. शिवसेनेचे निष्ठावंत समजले जाणारे एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारले. एकनाथ शिंदे यांनी पक्षात उभी फूट पाडत 40 आमदार आपल्या बाजूला वळवले आहेत. त्यानंतर या गटाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात असलेले  महाविकास आघाडी सरकार पाडले आणि भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले असून देवेंद्र फडणवीस हे नाट्यमयरीत्या उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यानंतर आता नव्या सरकारच्या शपथविधीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 


शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 12 किंवा 13 जुलैला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकनाथ शिंदे गट आणि भाजपमध्ये येत्या दोन दिवसात खाते वाटपावर चर्चा होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महत्त्वाची खाती शिंदे गटाला मिळणार आहे. भाजपकडे गृह, महसूल खाते जाण्याची शक्यता आहे. तर, शिंदे गटाकडे नगरविकास, सार्वजनिक बांधकाम खाते जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. 


वर्ष 2014 ते 2019 दरम्यानच्या काळात भाजप-शिवसेना युतीच्या काळात गृह, महसूल, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खाते भाजपकडे होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृह खाते हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे, महसूल खाते काँग्रेसकडे, नगरविकास खाते शिवसेनेकडे होते. 


दरम्यान, याआधी समोर आलेल्या माहितीनुसार, भाजप आणि एकनाथ शिंदे गटातील चर्चेनुसार, दर 6 आमदारांमागे एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद दिले जाऊ शकते. सहा आमदारांमागे एक मंत्री या सूत्रानुसार भाजपला फायदा होणार आहे. भाजपला या सूत्रानुसार 28  मंत्रिपदे मिळणार आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या:


शिवसेनेचं 'धनुष्यबाण' आमचंच; 'या' बंडखोर आमदाराचा मोठा दावा