मुंबई : राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपला ठाकरे सरकारनं दणका दिला आहे. राज्यातील बड्या भाजप नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्याचा मोठा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप नेते चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह मोठ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची झेड सिक्युरिटी काढण्यात आली असून त्यांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ गाडीही काढण्यात येणार आहे. तर वकील उज्ज्वल निकम आणि शुत्रुघ्न सिन्हा यांच्या सुरक्षेत मात्र वाढ करण्यात आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिक्युरिटी रिव्ह्यू मिटींग झाली. ही मिटींग दर एक ते दोन महिन्यांमध्ये होते. कोविड काळात पोलिसांवर खूप ताण आलेला आहे. त्यामुळे विरोधी पक्षांचा नेत्यांचा सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला.


मला सुरक्षेची गरज नाही, मी फिरत राहणार - फडणवीस
सुरक्षा कमी केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा सुरक्षा घेतली. मी भाजप प्रदेश अध्यक्ष होतो त्यावेळीही सुरक्षा घेतली नव्हती. याकूब मेननच्या फाशीनंतर आणि नक्षलवादी कारवायांनंतर केंद्राच्या सांगण्यावरुन माझी सुरक्षा वाढवण्यात आली होती. या सरकारला असं वाटत असेल की आता सुरक्षेची गरज नाही. मला सुरक्षेची गरज नाही, मी फिरत राहणार. परसेप्शनवर सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला जातो. मला चिंता नाही, आता राजकीय निर्णय केले जात आहेत. माझी कुठलीही तक्रार नाही, मी जनतेतला माणूस आहे, त्यामुळं माझ्या फिरण्यावर काहीही फरक पडणार नाही, असं फडणवीस म्हणाले.


"माझी सुरक्षा कमी करा".. शरद पवार यांचा गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन


राज्य एकदम सुरक्षित आहे म्हणून ही सुरक्षा काढली -सुधीर मुनगंटीवार
भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे की, सुरक्षा काढली याबद्दल सरकारचे धन्यवाद पण लोकांच्या सुरक्षेसाठी आमचा आवाज बंद होणार नाही. चंद्रपूर हा नक्षलग्रस्त जिल्हा असल्यामुळे आणि दारूबंदीमुळे मला ज्या धमक्या मिळत होत्या त्यासाठी सुरक्षा दिली होती. सुरक्षा एक एक ग्रेडने कमी केली जाते पण सरकारने एकदम शून्य केली. सरकारला मनापासून धन्यवाद की राज्य एकदम सुरक्षित आहे म्हणून ही सुरक्षा काढली, असा टोला भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे. हा निर्णय पूर्णपणे राजकीय आहे आणि याची नोंद तुम्ही ठेवा, सरकार येतं आणि जातं. आम्हाला स्वतःच्या सुरक्षेची चिंता नाही तर लोकांच्या सुरक्षेसाठी आमचा आवाज अजून धारधार होईल, असं ते म्हणाले.


माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार - नारायण राणे


भाजप खासदार नारायण राणे म्हणाले की, माझ्या जीवाचं काही बरं - वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार असेल. यापूर्वी देखील माझी सुरक्षा कमी कमी करण्यात आली. मला काही फरक पडत नाही माझ्याकडे केंद्राची सुरक्षा असल्याचं राणे यांनी म्हटलंय.


ठाकरे सरकारचा दणका; फडणवीस, राज ठाकरे यांच्यासह बड्या नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात


आमचा काही आक्षेप नाही, आमचं संरक्षण जनता करते - रावसाहेब दानवे
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, सरकार कोणत्या भावनेने हे करतंय, त्याचा उद्देश मला माहित नाही. केवळ देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील याचंच नव्हे तर माझ्यासह अनेक प्रमुख नेत्यांची सुरक्षा काढली. पण याबाबत आम्ही सरकारकडे दाद मागणार नाही. कारण आमचं संरक्षण पोलीस करते असं नाही तर राज्यातील जनता आमची सुरक्षा करते. त्यामुळे सुरक्षेत कपात केल्याने आमच्या कामात तसूभर ही फरक पडणार नाही आणि आम्ही हादरणारही नाही, असं ते म्हणाले. पोलीस संरक्षण देते तेव्हा ते सरकार देत नसते. यासाठी सरकारने नेमलेली एक समिती असते, ती समिती आढावा घेते. मग यांना काही धोका आहे का? याचा अहवाल पोलीस देते, मगच संरक्षण मिळतं. त्यानंतर ही सुरक्षेत कपात केली, पण आम्हाला काही चिंता नाही. आमचा काही आक्षेप नाही, कारण आमचं संरक्षण जनता करते.


सुडाच्या भावनेतून महाराष्ट्र सरकार नेत्यांची सुरक्षा कमी करतंय : राम कदम
ठाकरे सरकारनं घेतलेला हा निर्णय सुडाच्या भावनेतून महाराष्ट्र सरकार नेत्यांची सुरक्षा कमी करत आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं करण्यात येत असल्याचा आरोप भाजप नेते राम कदम यांनी केला आहे. राम कदम म्हणाले की, "गेल्या वर्षभराच्या कालखंडामध्ये भाजप नेत्यांनी महाराष्ट्र सरकारला आलेलं अपयश दाखवून दिलं. ना हे शेतकऱ्यांना मदत करु शकले, ना कोरोना काळातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही मदत करु शकले. ज्या कोकणानं शिवसेनेला भरभरुन दिलं त्या कोकणात आलेल्या चक्रीवादळानंतरही कोणतीही मदत करण्यात आली नाही. त्यामुळे सुडाच्या भावनेतून महाराष्ट्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे."


नेत्यांच्या सुरक्षितता कपात करण हे निव्वळ सूडबुध्दीच राजकारण : केशव उपाध्ये
"विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात, ताफ्यातील बुलेटप्रूफ गाडी काढली जाणार, त्याशिवाय भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर यांच्याही सुरक्षा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात कपात सरकारचा निर्णय म्हणजे हे कोत्या मनोवृत्तीचे, सूडाचे राजकारण आहे. हे सर्व नेते महाराष्ट्रात फिरून जनतेच्या भावभावना जाणत असतात. कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरात बसलेले असताना सर्वाधिक देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात फिरले व जनतेला दिलासा दिला. काल ही भंडारा येथे तेच पोहचले. या नेत्यांच्या सुरक्षितता कपात करण हे निव्वळ सूडबुध्दीच राजकारण."


कपटनितीने व सूडबुद्धीने निर्णय -आमदार गोपीचंद पडळकर


भाजप नेत्यांची सुरक्षा कमी केल्याच्या निर्णयावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. महाविकास आघाडी कपटनितीने व सूडबुद्धीने निर्णय घेतंय हे महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात येतंय असं ते म्हणाले. जे लोक घराभोवती सुरक्षा घेऊन घरात बसले आहेत त्यांची सुरक्षा काढण्याची खरी गरज आहे. महाविकास आघाडी सरकारला मुळातच देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता खुपत आहे. त्यामुळे आकस बुद्धीने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत या महाराष्ट्रातील पीडित, उपेक्षित, गोरगरीब जनतेचे आशीर्वाद आहेत व तेच त्यांचे सुरक्षा कवच आहे. त्यांना या सुरक्षेची मुळातच गरज नाही, असं ते म्हणाले.