मुंबई : "अजित पवार यांची देहबोली सुरुवातीपासूनच संशयास्पद होती. या सगळ्या घडामोडींशी शरद पवारांचा कोणताही संबंध नाही हे ठामपणे सांगू शकतो. अजित पवारांनी शरद पवारांना दगा दिला," असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत संजय राऊत अजित पवारांसह भाजपवर जोरदार टीका केली. भाजपने पैसा आणि सत्तेचा गैरवापर करुन सत्ता स्थापन केली. आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे संयुक्त पत्रकार परिषद घेतील, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.


आज (23 नोव्हेंबर) सकाळी आठच्या सुमारास महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. देवेंद्र फडणवीस यांनी आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस, भाजपचे काही नेते तसंच अजित पवार राजभवनावर पोहोचले. यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

अजित पवारांनी खंजीर खुपसला
राज्यात एकीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होणार असं वाटत असतानातच, भाजपच्या भूकंप शिवसेनेला मोठा धक्का बसला. मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचं शिवसेनेचं स्वप्न भंगलं. अजित पवार यांच्या बंडामुळे संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत जोरदार टीका केली. अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यांनी शरद पवारांना दगा दिला आहे. अजित पवारांची देहबोलू संशयास्पद होती. ते नजरेला नजर देऊ शकत नव्हते, असं संजय राऊत म्हणाले.

पैसा आणि सत्तेचा गैरवापर
राजभवनाचा सरळ सरळ अपमान आहे. रात्रीच्या अंधारात चोरुन पाप केलं जातं, दरोडा टाकला जातो. दिवसाढवळ्या, लोकांना आमंत्रित करुन शपथ का घेतली नाही, याचा अर्थ तुम्ही पाप केलं असा होतं. याची किंमत चुकवावी लागेल. शिवसेना खंबीर आहे. पदड्याआडून पैसा आणि सत्तेचा गैरवापर करुन, हे सगळं करण्यात आलं आहे. राज्यातील जनता हे विसरणार नाही, असं संजय राऊत म्हणाले. तसंच शरद पवार आणि उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतली असंही ते म्हणाले.