Aaditya Thackeray : 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुक दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भरपावसात केलेल्या भाषणाची मोठी चर्चा झाली होती. त्यानंतर पुण्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी देखील एका कार्यक्रमात भरपावसात न थांबता भिजत आपलं भाषण सुरूच ठेवल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या बंडखोरीमुळे शिवसेना महाराष्ट्र सरकारमधून बाहेर पडलीय, अशातच आदित्य ठाकरे यांनी काल सायंकाळी वडाळ्यात केलेले भाषणही चांगलंच चर्चेत आहे, याच कारण म्हणजे त्यांच्या भाषणाच्या वेळी देखील जोरदार पाऊस सुरू होता, आणि या भरपावसात त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधलाय. विशेष म्हणजे शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. काय म्हणाले आदित्य ठाकरे?


 






 



बंडखोर आमदार खासदारांच्या मतदारसंघात जाऊन ‘निष्ठा यात्रा’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 40 आमदारांसह 12 खासदारांनी पाठिंबा दिल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे शिवसेना महाराष्ट्र सरकारमधून बाहेर पडली, हीच शिवसेना ठाकरे कुटुंब वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी एकीकडे उध्दव ठाकरे शिवसेना भवनात बैठक घेत आहेत. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे बंडखोर आमदार खासदारांच्या मतदारसंघात जाऊन ‘निष्ठा यात्रा’ काढण्यास सुरुवात केली आहे. काल त्यांनी वडाळ्यातील शिवसेना शाखेस भेट दिली. येथील शिवसैनिकांशी संवाद साधत असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. पण त्यांनी भरपावसात सभा घेतल्यामुळे याची चर्चा आहे. विशेष म्हणजे त्यांनी छत्री न घेता, पावसात भिजून शिवसैनिकांशी संवाद साधलाय. त्याचवेळी शिवसैनिकांची पावसातही गर्दी कायम दिसली


 


ठाकरे परिवार आणी शिवसेना संपवायला हे निघाले आहेत: आदित्य ठाकरे


शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरेंनी काल मुंबईतील आग्रीपडा येथे एका आयोजित कार्यक्रमातही संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ''राज्यात सुरू असलेल्या सत्ता नाट्याला आज 1 महिना झाला. राग येण्यापेक्षा दुःख वाटतंय. ज्यांना भरभरून दिलं, त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. आम्ही कुणाचं वाईट केलं नाही, म्हणून ताठ मानेनं उभे आहोत.'' ते म्हणाले, ''गेलेले लपूनछपून, शिवसैनिकांना त्रास देत आहेत.''  परत येणाऱ्यांसाठी, मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत. लाज असेल तर राजीनामा द्या आणि निवडणूक लढवा. आमचा कायद्यावर विश्वास आहे. हे सरकार पडणारच. ठाकरे परिवार आणी शिवसेना संपवायला हे निघाले आहेत, असं ही ते म्हणाले आहेत. आदित्य ठाकरे म्हणाले, ''आपण राजकारण करत नाही. आपल्याला राजकारण जमत नाही. त्यामुळे असा दिवस बघावा लागत आहे. नेहमीच राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसतं. मात्र आज आज जे शिवसैनिक भेट आहेत. ते पाहून असं वाटत राजकरणात चांगल्या लोकांना स्थान असतं.''


शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक


या निष्ठा यात्रेत आदित्य ठाकरे बंडखोर खासदार आणि आमदारांच्या मतदारसंघातील शिवसेनेच्या शाखांनाही भेट देत आहेत. यावेळी ते गटप्रमुख, शाखाप्रमुख आणि शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. या निष्ठा यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सेनेतील निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना बळ देण्याचाही प्रयत्न केला जात आहे. विशेष म्हणजे शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. 


...तरी गद्दार हे गद्दारच: आदित्य ठाकरे


ते म्हणाले, ''सरकार चालवताना आपण मुंबईला सगळ्यात जास्त लक्ष दिलं. उद्धव ठाकरे चांगला माणूस असं लोकं म्हणतात.'' आदित्य ठाकरे म्हणाले, ''असं बरबटलेलं राजकारण पाहून तरुणांना राजकारणात यावंसं वाटेल का? कोणत्याही गटाचा शिक्का मारला तरी गद्दार हे गद्दारच असतात. गद्दार हाच खरा शिक्का.''


यापूर्वी कोणी कोणी घेतली भरपावसात सभा?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुक दरम्यान साताऱ्यात भरपावसात केलेल्या भाषणाची मोठी चर्चा सुरू होती. त्यानंतर 2021 मध्ये पुण्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भरपावसात न थांबता भिजत आपलं भाषण सुरूच ठेवल्याचं पाहायला मिळालं. यानंतर आता 2022 मध्ये आदित्य ठाकरेंनी भरपावसात शिवसैनिकांशी साधलेल्या संवादाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. धो-धो पावसातही काल आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक पाहायला मिळाले. बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात घेण्यात येणाऱ्या या निष्ठा यात्रेला कितपत फळ मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे


इतर महत्वाच्या बातम्या: 


OBC Reservation : ओबीसी राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा होताच राज ठाकरेंचं ट्विट, म्हणाले....
OBC : बांठिया आयोगावरील आरोपांचा फ्लॅशबॅक; आता श्रेय घेणाऱ्यांना त्यावेळी आयोगाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप, कोण काय म्हणालं होतं?
'काय नाना…..तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटिलात', व्हायरल व्हिडीओवरुन चित्रा वाघ यांचा नाना पटोलेंना प्रश्न