Nitesh Rane : एमआयएमचे तेलंगणातील आमदार अकबरुद्दीन औवेसी (Akbaruddin Owaisi) हे औरंगाबादच्या दौऱ्यावर असून त्यांनी खुल्ताबाद येथील औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतलं. औरंगाजेबच्या कबरीवर एमआयएमच्या नेत्यांनी माथी टेकवल्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी याबद्दल ट्वीट करत ओवैसीला इशारा दिला आहे. 


तर..आम्ही शिवरायांचे मावळे नाही!!!
भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी याबद्दल ट्वीट करत ओवैसीला इशारा दिला आहे. "मी आव्हान करतो, पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा.. याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर..आम्ही शिवरायांचे मावळे नाही!!!" असं ट्वीट करत त्यांनी इशारा केला आहे.


 






..हे तर नामर्दांचे सरकार : नितेश राणे



नितेश राणेंच्या दुसऱ्या ट्विटमध्ये असं म्हटलंय की, "या कारट्या ओवैसीला माहिती आहे का? की, मी औरंगजेबाच्या थडग्या समोर नागडा नाचलो तरी, मला दोन पायावर महाराष्ट्रात फिरता येईल.. कारण राज्यामध्ये "नामर्दांचे सरकार आहे"…" असं म्हणत त्यांनी सरकारवरही टीकास्त्र सोडलं आहे. त्याबरोबर शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनीही ओवैसी यांच्यावर टीका केली आहे.


 




राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया


संजय राऊत - औरंगजेबाच्या कबरीपुढे माथा टेकणाऱ्या अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर संजय राऊतांनी टीका केली आहे. ते म्हणाले, औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन हा रितीरिवाज असू शकत नाही, वारंवार औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकवत महाराष्ट्रात अशांतता पसरविण्याचा प्रयत्न ओवेसींकडून होतोय. औरंगजेबाने आमची मंदिरं उध्वस्त केली, औरंगजेबाला ही महाराष्ट्राच्या याच मातीत गाडलं होतं, तुम्हालाही त्याच कबरीत जावं लागेल हे लक्षात ठेवा. ज्यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं, त्यांनाही याच मातीत गाडू, त्यामुळे महाराष्ट्राला आव्हान देण्याचा प्रयत्न करण्यात येत असेल तर आम्ही ते आव्हान स्वीकारायला तयार आहे असं संजय राऊत म्हणाले.


इम्तियाज जलील - खुल्ताबादमध्ये गेल्यानंतर सर्वजण औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतात असं औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे यावरुन कोणताही वाद निर्माण करणे चुकीचं असल्याचंही त्यांनी सांगितलं. औरंगाबादमध्ये गरीब मुलांना शिक्षण घेता यावं यासाठी सर्व सुविधांनी युक्त अशी अत्याधुनिक शाळा सुरु करण्यात येणार आहे. यासाठीच  एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन औवेसी यांनी खुल्ताबाद या ठिकाणी जाऊन सर्व दर्ग्यांचं दर्शन घेतल्याचं खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितलं. 


अमोल कोल्हे - ''आज एक हैदराबादचे महाशय औरंगाबादमध्ये आले आहेत. औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन नतमस्तक झाले. ज्या औरंगजेबाने स्वतःच्या वडिलांचे हाल केले. ज्याने सख्ख्या भावंडांची कत्तल केली. त्या माणसाचं उदात्तीकरण करून तुम्ही नेमकं कोणतं उदाहरण समाजासमोर ठेऊ पाहताय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात त्यांचे अंगरक्षक हे मुस्लिम होते. तेंव्हा अठरा पगड जातीचे सगळे एकत्र आले, ते स्वाभीमानासाठी. रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी. तेंव्हा असं वागा की, माझा माझ्या राष्ट्राला अभिमान वाटेल. जेंव्हा अशी भावना बळावते तेंव्हा कोणत्याही अतिरेकी वंश वादावर जातो, तेंव्हा तो राष्ट्र कधी टिकत नाही. जर्मनी, अफगाणिस्तान याची जिवंत उदाहरणे आपल्या समोर आहेत. तेंव्हा हातात येणारा दगड कोणत्या कामासाठी वापरतो, हे महत्त्वाचं. एक दगड समाज जोडू शकतो, अन् तो विकास कामासाठी वापरला तर तो दगड समाजाच्या वापरासाठी येतो.''


चंद्रकांत खैरे - शिवसेनेच्या माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, "औरंगजेबने इथल्या नागरिकांवर जिझिया कर लावला. हिंदू मंदिरं पाडली, लोकांना त्रास दिला. हिंदू धर्म नष्ट करण्याचा त्याचा प्रयत्न केला. खुल्ताबादमधील इतर दर्ग्यांमध्ये लोक जातात, पण त्या ठिकाणच्या औरंगजेबच्या कबरीचं दर्शन कोणीही घेत नाही. आज एमआयएम वाल्यांनी औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतलं. यामधून काहीतरी नवीन राजकारण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे."


वारिस पठाण - एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, अकबरुद्दीन औवेसी हे आज एका शाळेची स्थापना करण्यासाठी आले आहेत. त्यासाठी आज आम्ही सर्व दर्ग्यांचं दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. यामध्ये कोणतंही राजकारण नाही.एका कबरीचं दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्या कबरीकडे दुर्लक्ष करणे चुकीचं आहे. त्यामुळे आम्ही सर्वच कबरींचं दर्शन घेतलं.


मनसे प्रवक्ते गजानन काळे - अकबरुद्दीन औवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन महाराष्ट्राचा, शिवप्रेमींचा अपमान केला आहे. ज्या औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राशी द्रोह केला,  त्याच्या कबरीवर सच्चा मुसलमान जात नसताना या निजामाच्या औलादीने तिथे भेट दिली आहे. मनसेच्या सभेला जाचक अटी महाराष्ट्र सरकार घालत असताना यांच्याकडे मात्र दुर्लक्ष केलं जातं. निजामाची पिलावळ महाराष्ट्राचे वातावरण खराब करीत आहेत.