Bacchu Kadu : अखेर राज्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अकोला न्यायालयाच्या आदेशानंतर सिटी कोतवाली पोलीसांनी हे गुन्हे दाखल केलेत. पाच कलमांतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कलम 405, 409, 420, 468 आणि 471 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून काही गुन्हे अजामीनपात्र असल्याने बच्चू कडूंच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे.


1 कोटी 95 लाखांच्या आर्थिक अपहाराचा आरोप


वंचित बहुजन आघाडीनं बच्चू कडू यांच्यावर अकोला जिल्ह्यातील तीन रस्ते कामांत 1 कोटी 95 लाखांच्या आर्थिक अपहाराचा आरोप केला होता. पालकमंत्र्यांनी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांच्या कामांना मंजूरी दिल्याचा गंभीर आरोप वंचितनं केला होता. वंचितच्या पाठपुराव्यानंतर बच्चू कडूंवर आर्थिक अपहाराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वंचितनं यासंदर्भात  राज्यपालांकडेही कारवाईसाठी परवानगी मागितली होती. न्यायालयानं या प्रकरणात अपहार झाल्याचं प्राथमिक मत नोंदवत गुन्हे दाखल करण्याचे आदेश सिटी कोतवाली पोलिसांना दिले होते. 


बच्चू कडूंवर दाखल झालेले कलम आणि शिक्षा


सर्वच गुन्हे अजामीनपात्र, बहुतेक गुन्ह्यांमध्ये 7 वर्ष शिक्षा
1) 405 - सरकारी पैशांची अपव्याची व्याख्या, 3 वर्ष शिक्षा
2) 409 - सरकारी पैशांचा अपव्यय, 10 वर्ष, जन्मठेप
3) 420, - फसवणूक, 7 वर्ष शिक्षा
4) 468 - पुराव्याशी छेडछाड करणं
5) 471 - खोटं कागदपत्र खरे दाखवणे, 3 वर्ष शिक्षा.


'या' तीन रस्त्यांच्या कामात केलाय वंचितने अपहाराचा आरोप 


गायगाव ते रिधोरा रस्त्याला जोडणारा लहान पुल आणि पोचमार्गाच्या कामात 50 लाखांच्या अपहाराचा आरोप. 


इतर जिल्हा मार्गाला (इजिमा) जोडणाऱ्या धामना ते नवीन धामना जोड रस्ता सुधारणेच्या कामात 20 लाखांच्या अपहाराचा आरोप. 


कुटासा ते पिंपळोद मार्गाला जिल्हा मार्ग मार्ग दाखवत यासाठी निधी वळता करीत 1 कोटी 25 लाखांच्या अपहाराचा आरोप.


काय आहे प्रकरण? 


वंचित बहुजन आघाडीनं अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर आर्थिक अपहाराचे गंभीर आरोप केले होते. पालकमंत्री बच्चू कडूंनी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर निधी वळता करीत 1 कोटी 95 लाखांचा अपहार केल्याचा आरोप वंचितनं केला होता. याची ठिणगी तीन रस्त्यांच्या कथित कामांवरून पडली. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील शिफारस केलेली रस्त्यांची कामं पालकमंत्री कडूंनी डावलल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेला डावलत आपल्या मर्जीतील रस्त्यांची कामं नियमबाह्यपणे करवून घेतल्याचा आरोप वंचितनं केला. यातील दोन रस्ते अस्तित्वातच नसल्याचे पुरावे त्यांनी सादर केले होते. या तीन रस्त्यांच्या कामांत बच्चू कडूंनी १ कोटी ९५ लाखांचा अपहार केल्याचा आरोप वंचितनं केला होता. यात जिल्हा परिषदेच्या अधिकारावर पालकमंत्र्यांनी अतिक्रमण केल्याचं वंचितनं म्हटलं होतं. यात रस्त्यांचे 'ग्रामा (ग्रामीण मार्ग) क्रमांक' नसतांना कामांना प्रशासकीय मान्यता कशी मिळू शकते, असा सवाल वंचितनं केला होता. दरम्यान, वंचितच्या तक्रारीनंतर अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरांनी या तीन रस्त्यांसह 25 कामांना दिली स्थगिती दिली होती. 


राज्यमंत्री बच्चू कडू यांनी फेटाळले होते आरोप 


याप्रकरणी पोलिस कारवाई होत नसल्यानं वंचितनं अकोला जिल्हा न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर जिल्हा न्यायालयाने या प्रकरणात सकृतदर्शनी गैरव्यवहार झाल्याचं प्राथमिक निरिक्षण नोंदवलं होतं. यासंदर्भात पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर कारवाईसाठी राज्यपालांची परवानगी घेण्याचं न्यायालयानं सुचित केलं होतं. यासाठी 90 दिवसांची मुदत देण्यात आली होती. यासंदर्भात वंचितच्या शिष्टमंडळानं 7 फेब्रूवारीला प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची भेट घेत कारवाईसाठी परवानगीची मागणी केली होती. मात्र, वंचितनं यासंदर्भात सर्वात आधी आरोप केल्यानंतर बच्चू कडू यांनी आर्थिक अनियमिततेचे आरोप फेटाळले होते. यासंदर्भात वंचितकडून तांत्रिक बाबींचा आधार घेत गैरसमज पसरवला जात असल्याचं राज्यमंत्री कडू म्हणाले होते. दरम्यान, यासंदर्भात आपले राजकीय मित्र असलेल्या प्रकाश आंबेडकरांच्या पक्षानं हे आरोप केल्याचं दु:ख असल्याचे राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले होते.