Vijay Wadettivar On CM Corona : राज्याचे मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात कोरोना वाढत आहे. लोकांनी आणि मीडीयानी ही मास्क वापरावा असे मत काल नागपूर विमानतळावर व्यक्त केले. मी ही मास्क वापरतो, मीडियाने ही वापरावा असे ते म्हणाले. मात्र, जेव्हा मीडीयाने वडेट्टीवार यांना दोनच दिवसांपूर्वी कोरोना असताना ही मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगला सोडताना गर्दीतून जाऊन लोकांचे अभिवादन स्वीकारले होते, गर्दीत जाऊन लोकांना भेटले होते, अशी आठवण करून दिली. तेव्हा मात्र काही सेकंदापूर्वीच कोरोना वाढत आहे, लोकांनी मास्क घालावे अशी सूचना करणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भाषा अचानक बदलली. 


अन् मुख्यमंत्र्यांच्या कोरोनाबाबत विचारताच वडेट्टीवार बदलले!


वडेट्टीवार म्हणतात,  कोरोना आता तेवढा तीव्र राहिला नाही. आता पाच दिवसांमध्येच रुग्ण बरे होतात. त्यामुळे काळजी नाही असं विरोधाभासी वक्तव्य त्यांनी केले. त्या दिवशी मुख्यमंत्री मिरवणुकीच्या स्वरूपात जेव्हा वर्षा बंगल्यावरून मातोश्रीला आपल्या निवासस्थानी गेले. तेव्हा पाच दिवसानंतर ते बाहेर आले होते. त्यांची कोरोना चाचणी दोन तीन दिवस आधीच केली होती. तसेच ते मास्क घालून होते. आता ही ते ऑनलाइन काम करत आहे. लोकांमध्ये ते जात नाही. त्यामुळे प्रोटोकॉलचा उल्लंघन नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून ते प्रत्येकाची काळजी घेत आहेत असे वडेट्टीवार म्हणाले. त्यामुळे कोरोनाच्या तीव्रते बद्दल आपत्ती व्यवस्थापन मंत्रींचे नेमके कोणते वक्तव्य खरे मानायचे असे प्रश्न निर्माण झाले आहे. 


आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत आहोत 
आम्ही काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत... याशिवाय त्यांच्या पक्षांतर्गत जो वाद सुरू आहे.. त्यासंदर्भात मुख्यमंत्री त्यांचे विचार आणि भूमिका मांडत आहेत. त्यामुळे आम्ही त्याबद्दल बोलणे योग्य नाही असे वडेट्टीवार म्हणाले.


होय, मी पण शिवसेना सोडली होती
बरं झालं तुम्ही मला शिवसेना सोडल्याबद्दल प्रश्न विचारून त्या घटनेची आठवण करून दिली. 16 वर्षांपूर्वी मी ही शिवसेना सोडली होती. आता त्याबद्दल मी अधिक बोलण्याची गरज नाही. आता मी दुसऱ्या पक्षात स्थिरावलो आहे. त्यामुळे त्याबद्दल जास्त बोलणार नाही असे वडेट्टीवार म्हणाले..


मंत्रालयातून वर्षभरात हजारो जीआर निघतात
मंत्रालयातून दर वर्षी दहा हजार जीआर निघतात. त्यामुळे आता जीआर निघत असेल तर विरोधकांनी तक्रार करू नये. सरकार म्हणून आम्ही काम करू नाही का असा सवाल ही वडेट्टीवार यांनी विचारले. गेल्या काही दिवसात काढलेले जीआर जलसंधारणाच्या कामासंदर्भातले आहेत. आम्ही बाळासाहेबांच्या स्मारकासाठी चा जीआर काढला. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा संदर्भात जीआर काढला. त्यामुळं जनतेच्या हिताच्या कामाचे जीआर काढले असेल तर त्याला विरोध करणे योग्य नाही, सरकार काम करतय, काम थांबलेलं नाही हेही त्यावरून दिसून येते आहे असा दावा वडेट्टीवार यांनी केला. 


विधानसभा भंग करण्यास काँग्रेसचा विरोध 
जर सरकारकडे बहुमत नसेल तर कोणालाही सरकार म्हणून काम करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे सरकार कोसळले आणि तशी परिस्थिती आली तर आम्ही त्याला सामोरे जाऊ असे वडेट्टीवार म्हणाले. मात्र, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता विधानसभा भंग करावी, अशी काँग्रेसची भूमिका नाही असे वडेट्टीवार म्हणाले.