Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला. भाजपकडून सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु झाल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे देखील गोव्याहून मुंबईकडे रवाना देखील झाले आहेत. ते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर शिंदे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून आज रात्री किंवा उद्या सकाळी शपथ घेणार आहेत.


फडणवीस आणि शिंदे आज करणार सत्ता स्थापनेचा दावा


दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे आज सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. हे दोघेही साडेतीन वाजता राजभवनावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, आत्ताच भाजपच्या कोअर कमिटीची बैठक संपली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. एकनाथ शिंदे हे थेट गोव्याहून फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी पोहोचतील. त्यानंतर भाजपचे एक शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे. आजच भाजपकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे. त्यामुळं आज रात्री किंवा उद्या सकाळी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत याबाबच शिक्कामोर्तब झाला आहे. आज राजभवनावर जाऊन देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे सरकार बनवण्याचा दावा करतील. दरम्यान या पार्श्वभूमीवर राजभवन परिसरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.


10 दिवसानंतर राजकीय नाट्यावर पडदा


शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि राज्यातील सत्तासंघर्षाची सुरुवात झाली. शिवसेनेतील काही आमदारांसह एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले आणि शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. एकापाठोपाठ एक आमदार आणि मंत्री एकथान शिंदेंच्या गटात सामील होऊ लागले. खरं तर तेव्हापासूनच महाविकास आघाडी सरकारचं काउंटडाऊन सुरु झालं होत. भावनिक साद, आवाहन, अल्टिमेटम सर्व काही करुन झालं पण बंडखोर आमदार आपल्या भूमिकेवर ठाम होते. आरोप-प्रत्यारोपांची सत्र रंगली आणि अखेर या राजकीय नाट्यावर पडदा पडला तो म्हणजे, उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यामुळे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग केला आणि गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्रात सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. 


शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्यामुळे महाविकास आघाडी सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. शिवसेनेतील प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे  यांनी काही आमदारांसह केलेल्या बंडामुळं राज्यात गेले दहा 10 दिवस राजकीय नाट्य पाहायला मिळाल. राज्यातील राजकीय भूकंपाचं केंद्र सूरत ते गोवा व्हाया गुवाहाटी असं सरकत गेलं. आणि उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानं या राजकीय नाट्यावर पडदा पडला. 


महत्वाच्या बातम्या: