Maharashtra Political Crisis : शिवसेनेत भांडणं लावून राष्ट्रवादी मजा पाहतेय, असा आरोप बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. शिवसेनेमध्ये अंतर्गत कलह निर्माण करुन राष्ट्रवादी मजा बघत आहे. सध्या शिवसेनेत जो कलह निर्माण झाल्याय त्यावरुन शिवसैनिकांनी आपआपसांत भांडू नये, एकमेकांची डोकी फोडू नका, असं आवाहन देखील शिरसाट यांनी केलं आहे.  गुवाहाटीतल्या हॉटेलातून आमदार शिरसाट यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. राज्यात बैठकांचं सत्र सुरु असल्याचं सांगितल्यानंतर शिरसाट म्हणाले की, गुवाहाटीमध्ये देखील आमच्या बैठका चालू आहेत.


गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं होतं पत्र


औरंगाबाद पश्चिमचे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं होतं.  त्यातून त्यांनी आमदारांची व्यथा मांडली होती.  गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी 'वर्षा'चे दारे बंद होती.  शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यात आम्हाला कधीही थेट प्रवेश मिळाला नाही.  आमच्यासाठी मंत्रालयातील सहाव्या माळ्याचाही प्रश्न आला नाही कारण तुम्ही मंत्रालयात कधी गेलाच नाही. तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं ठेवलं जायचं. बडव्यांना अनेकवेळा फोन केला तर बडवे फोन रिसिव्ह करत नसायचे. शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो. आमची व्यथा,आपल्या आजूबाजूच्या बडव्यांनी कधीच आपल्यापर्यंत पोहोचू दिली नाही, असा आरोप त्यांनी केला होता. 
 
शिरसाट यांनी म्हटलं होतं की, आमची ही सर्व गाऱ्हाणी पक्षात फक्त शिंदे साहेबच ऐकत होते. आदित्य ठाकरे अयोध्येला गेले तेंव्हा आम्हाला अयोध्येला जाण्यापासून तुम्ही का रोखलं? विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर आमच्यावर इतका अविश्वास का दाखवला? आमच्या प्रत्येक कठिण प्रसंगांत शिंदे साहेब यांच्या घराचे दरवाजे आमच्यासाठी उघडे आहेत, या विश्वासापोटी आम्ही शिंदे साहेबांसोबत आहोत, असं त्यांनी म्हटलं होतं. 


कोण आहेत शिरसाट...


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहणारे संजय शिरसाट यांचा राजकीय इतिहास खूपच संघर्षाचा आहे. शिरसाट यांच्या खांद्यावर जेव्हा घरची जवाबदारी आली त्यावेळी त्यांनी सुरुवातीला भाजीपाला विकला, गॅसचे फुगे विकले. त्यानंतर 7 रुपये रोजंदारीवर एका कंपनीत काम केलं. पुढे ते ऑटो रिक्षाचालकाचं काम करू लागले. दरम्यान याच काळात ते शिवसेनेशी जोडले गेले. पुढे  2000 मध्ये महानगर पालिकेत नगरसेवक म्हणून ते निवडून आले. सलग दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून येत त्यांनी पक्षात आपली छाप पाडली. त्यामध्ये त्यांनी सभागृह नेतेपद भूषवले. 2009 मध्ये नव्याने अस्तित्वात आलेल्या औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात त्यांनी आमदारकी लढवत विजय मिळवला. त्यानंतर सलग तीनवेळा आमदार म्हणून ते निवडून आले.