Maharashtra Political Crisis Eknath Shinde: राज्याच्या राजकारणात भूकंप घडवून आणणारे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी 'एबीपी माझा'सोबत बोलताना आपली कोणतीही अट नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्यांनी एका प्रश्नाचे उत्तर देणे एकनाथ शिंदे यांनी टाळले. त्यांच्या या पावित्र्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील भवितव्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. 


एकनाथ शिंदे यांनी काय म्हटले?


एकनाथ शिंदेंनी एबीपी माझासोबत बोलताना म्हटलं की, हिंदुत्व आमच्यासाठी महत्वाचं आहे.माझ्यासोबत असलेले आमदार हिंदुत्वाशी एकनिष्ठ आहेत.सत्ता प्राप्त करण्यासाठी हिंदुत्वाशी तडजोड कधीच करणार नाही,असं ते म्हणाले. शिंदे यांनी सांगितलं की, आमच्यासोबत 46 आमदार आहेत. या शिवसेनेसह इतरही आमदार आहेत.हा आकडा अजून वाढणार आहे.आमच्या कुठल्याही अटी नाहीत.


कोणत्या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले?


एकनाथ शिंदे यांनी आमदारांचे अपहरण केल्याचे आरोप फेटाळून लावले. आमदारांचे अपहरण केले असते तर त्यांना सुखरुपपणे राज्यात पाठवले नसते, असेही त्यांनी म्हटले. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असल्याचे मान्य केले. त्याशिवाय रश्मी ठाकरे यांच्यासोबत ही चर्चा झाल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, त्यांनी चर्चेचा तपशील सांगण्यास नकार दिला. उद्धव ठाकरे यांना तुम्ही तुमचा नेता मानता का, असा थेट प्रश्न केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उत्तर देणे टाळत फोन ठेवून दिला. 


आम्ही शिवसेना सोडली नाही आणि सोडणारही नाही  


एकनाथ शिंदे यांनी काही वेळापूर्वी बोलताना म्हटलं होतं की, शिवसेनेच्या माझ्यासोबतच्या आमदारांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे त्यांनी हिंदुत्वाची जी शिकवण दिली त्यावर आम्ही पुढे जात आहोत. सत्तेसाठी असो किंवा मग राजकारणासाठी असो हिंदुत्वाचे बाळासाहेबांचा आहे ते कडवट हिंदुत्व ही भूमिका ही भूमिका आम्ही सर्व जण पुढे घेऊन जातोय. आम्ही सगळे बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहोत. आम्ही शिवसेना सोडली नाही,आम्ही शिवसेना सोडणार नाही. बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची भूमिका घेऊन आम्ही पुढचे राजकारण समाजकारण करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.