Maharashtra Political Crisis : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी विरोधकांनी आता आक्रमक चाली खेळण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील मोठा विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून सूचक मौन बाळगले जात असताना दुसरीकडे लहान पक्ष अधिक सक्रिय झाल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडी सरकारविरोधात अविश्वास मत ठराव मांडण्यात येणार आहे. मात्र, हा ठराव भाजप मांडणार नसून प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू दाखल करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 


बच्चू कडू हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यांचे विधानसभेत त्यांच्यासह दोन सदस्य आहेत. येत्या दोन दिवसांत बच्चू कडू हे राज्यपालांची भेट घेऊन अविश्वास मत ठराव दाखल करण्याची शक्यता आहे. बच्चू कडू हे राज्यपालांची भेट घेऊन पाठिंबा काढल्याचे पत्र सादर करणार असल्याची माहिती आहे. या पत्रानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगू शकतात. सुप्रीम कोटातील सुनावणीनंतर राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीत भाजप नेत्यांसोबत चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे. 


भाजप-शिंदे गटाचं ठरलं? असा आहे नव्या सरकारचा मंत्रीपदाचा फॉर्म्युला


महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपच्या पडद्याआडून हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप आणि एकनाथ शिंदे गटामध्ये संभाव्य मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाली आहे. यामध्ये भाजपच्या कोट्यात 18 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्री पदासह 28 मंत्री असणार आहे. तर, शिंदे गटाला 6 कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्री पद देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेबाबत भाजप आणि एकनाथ शिंदे गटात झालेल्या चर्चेनुसार, दर 6 आमदारांमागदे एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रीप पद दिले जाऊ शकते. मात्र, खाते वाटपाचे हे सूत्र अंतिम झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सहा आमदारांमागे एक मंत्री या सूत्रानुसार भाजपला फायदा होणार आहे. भाजपकडे या सूत्रानुसार 28  मंत्रीपदे मिळणार आहेत. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: