Maharashtra Assembly Session Phone Tapping: फोन टॅपिंगच्या मुद्यावर (Phone Tapping Case) विरोधकांनी आज विधानसभेत आक्रमक पवित्रा घेतला. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांच्या चौकशी प्रकरणात हायकोर्टात राज्य सरकारने क्लोजर रिपोर्ट (Closer Report) दाखल केल्यानंतर विरोधी पक्षांनी सभागृहात चर्चेची मागणी केली. मात्र, नियमांचा दाखला देत विधानसभा अध्यक्षांनी (Maharashtra Assembly Speaker) प्रश्नोत्तराचा तास पुकारला. विधानसभा अध्यक्षांकडून सरकारचा बचाव होत असल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला. 


विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर काँग्रेस (Congress) आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी फोन टॅपिंगचा मुद्या उपस्थित केला. नाना पटोले यांनी म्हटले की, रश्मी शुक्ला यांचा क्लोजर रिपोर्ट राज्य सरकारने हायकोर्टात दाखल केला. राज्यातील सरकार बदलल्यानंतर तात्काळ हा निर्णय घेण्यात आला. चौकशी न करता हा  क्लोजर रिपोर्ट का पाठवला असा सवाल, नाना पटोले यांनी केला. या फोन टॅपिंग प्रकरणात  माझा फोनदेखी टॅप करण्यात आला होता. या प्रकरणात गृहमंत्री यांचा थेट हस्तक्षेप असल्याचा आरोप पटोले यांनी केला. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी नियम 57 नुसार करण्यात आलेली चर्चेची मागणी फेटाळली असून नियमाने सभागृहाचे कामकाज चालेल असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले. फोन टॅपिंग प्रकरणावर चर्चा करावी या मागणीसाठी नाना पटोले आणि विरोधी बाकांवरील काही आमदार वेलमध्ये उतरले होते.


विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी फोन टॅपिंग चर्चेची मागणी करताना म्हटले की, नाना पटोले यांनी मुद्दा उपस्थित केला होता. नाना पटोले, बच्चु कडू, संजय काकडे अशा अनेक लोकांचे प्रबळ कारण नसताना फोन टॅप करण्यात आले. आयपीएस अध्कीरी रश्मी शुक्ला यांनी या नेत्यांचे फोन टॅप केले होते. अशा प्रकारचे कृत्य हे लोकशाहीला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे पवार यांनी म्हटले. फोन टॅपिंग प्रकरणात हा तपास बंद करण्याचा प्रयत्न  करण्यात आला असल्याचे सांगितले. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी नियमांचा दाखला देत चर्चेची मागणी फेटाळली. विधानसभा अध्यक्षांनी सभागृहाच्या सदस्यांचे संरक्षण करणे ही त्यांची जबाबदारी असते. मात्र, विधानसभा अध्यक्षांकडून सरकारचा बचाव केला जात असल्याचे समज विरोधी पक्षांचा झाला असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले. विधानसभा अध्यक्षांविरोधात सभात्याग करत असल्याचे पवार यांनी म्हटले. 


विरोधी पक्षांची गळचेपीचा प्रयत्न


सभात्याग केल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले की, नियम 57 नुसार, फोन टॅपिंगच्या मुद्यावर चर्चा व्हावी अशी आम्ही मागणी केली होती. वास्तविक हे प्रकरण कोर्टात गेले होते. फोन टॅपिंग झाला, असा अहवाल होता. आज सभागृहात चर्चा व्हायला हवी होती पण तसे झाले नाही. आम्ही वेगवेगळ्या आयुधांचा वापर करून चर्चा करतो. जनतेचे प्रतिनिधीत्व करणाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात नसेल तर जनतेने कुठं जायचे असा प्रश्न त्यांनी केला.


काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी म्हटले की, रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग केल्याचे समोर आले. राज्यातील सरकार बदलल्यानंतर त्यांना क्लिन चिट देण्यात आली. क्लोजर रिपोर्टवरून सरकारला कोर्टाने धारेवर धरले आहे. 
आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. फोन टॅपिंग राजकीय नेत्यांचे नाही तर, पत्रकार आणि अधिकाऱ्यांचेदेखील करण्यात आले. फोन टॅपिंग करणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे. विधानसभा अध्यक्ष सरकारच्या बाजूने निर्णय घेत असल्याचा त्यांनी आरोप केला.