मुंबई : मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीसाठी आता दुपारी 12 ते सायंकाळी 6 कालावधीत बंद राहणार आहे. तांत्रिक कारणास्तव याआधीच्या आदेशामध्ये अंशतः बदल करण्यात येत असून  परशुराम घाट महामार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णत: बंद करण्यात येत आहे. चौपदरीकरणाच्या कामामध्ये अडथळा निर्माण होऊ नये व कामाला गती मिळावी आणि पावसाळ्यापूर्वी धोकादायक क्षेत्रातील काम पूर्ण व्हावे यासाठी घाट बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे.  


चौपदरीकरणाचे काम करण्याच्या दृष्टीने  25  एप्रिल 2022 ते 25  मे 2022 या कालावधीत सकाळी 11.00 ते सायंकाळी 05.00 या दरम्यान परशुराम घाट महामार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक  या आधीच्या  22 एप्रिल 2022 आदेशाने पुर्णत: बंद करण्यात आलेली आहे.  तांत्रिक कारणास्तव याआधीच्या आदेशामध्ये अंशतः बदल करण्यात आले असून 3 मे ते  25  मे 2022 या कालावधीत दुपारी 12.00 ते सायंकाळी 06.00 या दरम्यान परशुराम घाट महामार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली आहे. तथापी, वाहतूक बंदी कालावधीत केवळ कमी वजनाची (Light Vehicle) वाहतूक ही आमडस-चिरणी-लोटे रस्ता कळंबस्ते-आमडस-धामणंद रस्ता मार्गे पर्यायी मार्गाने वळविण्यात आलेली आहे.


या कामाला गती देऊन पावसाळ्यापूर्वी रुंदीकरण पूर्ण करणे, तसेच आवश्यक तिथे संरक्षण भिंती उभारण्यासाठी ही वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. साधारणपणे एक महिना हे काम चालेल. परशुराम घाट चौपदरीकरण कामावेळी घाटाच्या वरच्या बाजूला असणाऱ्या दुर्गवाडी मधील 15 घरे व घाटाच्या खालच्या बाजूला मौजे पेढे गावातील कुंभारवाडी मधील 20 घरे, बौद्धवाडी मधील 7 घरे, घरभेवाडीतील 17 घरे, कोष्टेवाडीतील 12 घरे अशा एकूण 71 घरांना चौपदरीकरण कामावेळी व पश्चात कोणत्याही प्रकारचा धोका पोहोचणार नाही, याची दक्षता घ्यावी पर्यायी वाहतूक मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून पोलिस अधीक्षक रत्नागिरी व उपप्रादेशिक वाहन अधिकारी रत्नागिरी यांनी योग्य ते नियोजन करून आवश्यक ते पोलीस चौकी, अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करावी, अशा सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात.