पालघर : पालघर येथील दरोडेखोर असल्याच्या संशयावरून तीन जणांची हत्या केल्या प्रकरणी आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील आणि लज्जास्पद कृत्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. तर हल्ला करणारे व ज्यांच्यावर हल्ला झाला या पैकी कुणीही वेगळ्या धर्माचे नाहीत त्यामुळे या प्रकरणात समाजात आणि समाज माध्यमांतून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर पोलिस व सायबर सेलला कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.


पालघर येथील घटनेचा देशभरातून तीव्र निषेध होत आहे. ज्या दिवशी गुन्हा घडला, त्याच दिवशी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्वीट करुन सांगितले आहे.





गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, पालघरची घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेचं राजकारण करु नये. उच्च स्तरीय चौकशी सुरू असून आतापर्यंत 110 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील 9 जण अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.  कुणीही या घटनेचे विवाद करुन सामाजिक/जातीय तेढ निर्माण करत नाही यावरही सरकार लक्ष ठेऊन आहे, असं ट्विट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. या प्रकरणात समाजात आणि समाज माध्यमांतून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर पोलिस व सायबर सेलला कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत, असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.




Palghar Mob Lynching | पालघर गृहमंत्री अनिल देशमुखांनी राजीनामा द्यावा, पोलिसांवरही कारवाई व्हावी, भाजप नेत्यांची मागणी



चोर समजून तिघांवर हल्ला


मुंबईतील कांदिवलीहून आपल्या गुरुचे निधन झाले म्हणून त्यांच्या अंत्यविधीसाठी सुशील गिरी महाराज (35), चिकणे महाराज (70) आणि चालक निलेश तेलगडे (30) इको कारने सूरतकडे निघाले होते. त्यांच्याकडे कोणताही पास नसल्याने त्यांना चारोटी टोलनाका येथे पोलिसांनी माघारी पाठवले. परंतु, त्यांना सूरत गाठायचंच होतं म्हणून ते माघारी फिरून आड मार्गाने विक्रमगडहून जव्हार-दाभाडीमार्गे दादरा नगर हवेलीच्या हद्दीवर असलेल्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे रात्री 9.30 वाजेच्या सुमारास पोहचले. मात्र, त्याठिकाणी वनविभागाच्या चौकीजवळ असलेल्या जमावाने या तिघांची गाडी अडवली आणि चोर समजून दगड, कोयते, काठ्यांनी मारण्यास सुरुवात केली. त्यांच्यासह त्यांची कार पलटी केली. तेथे असलेल्या गार्डने प्रसंगावधान राखून पोलिसांना सूचना दिली. त्यामुळे तात्काळ 10.30 वाजेच्या सुमारास पोलीस आपल्या गाडीसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या तिघांना कारमध्ये बसवून जखमी अवस्थेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, जमाव शेकडोंच्या संख्येने असल्याने चार पोलिसांचे काहीच चालले नाही. यावेळी पोलिसांबरोबर असलेल्या जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ चौधरी यांनीही जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी या तिघांना कसंबसं आपल्या गाडीत बसवले.मात्र, त्यानंतर जमाव अधिक आक्रमक झाला आणि गाडीबरोबर पोलिसांवरही हल्ला चढवला. या घटनेतून पोलीस कसेबसे बचावले, परंतु त्या तीन जणांची जमावाने पोलिसांच्या गाडीतच दगड, काठ्या, कोयत्याने वार करुन निर्घृण हत्या केली.


संबंधित बातम्या :


पालघर जमाव हत्याकांड : 101 आरोपींना पोलीस कोठडी; तर अल्पवयीन 9 जणांची बालसुधारगृहात रवानगी