पालघर : दरोडेखोर असल्याच्या संशयावरून शुक्रवारी रात्री गडचिंचले येथे तीन जणांची हत्या केल्या प्रकरणी 110 आरोपींना कासा पोलिसांनी अटक केली होती. त्यापैकी 9 आरोपी 18 वर्षांखालील असल्याने त्यांना भिवंडीच्या बालसुधारगृहात पाठविण्यात आले. तर अन्य 101 आरोपींना शनिवार, 18 एप्रिलला डहाणू कोर्टात हजर करण्यात आले. त्यांना 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर काही आरोपी फरार असून त्यांचा शोध कासा पोलीस करीत आहे. तर, सारणी हल्ला प्रकरणातील 13 जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची रवानगी ठाणे कारागृहात करण्यात आली आहे.
कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनच्या काळात पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही समाजकंटक चोर, दरोडेखोर येतात आणि किडन्या काढून नेतात अशा वेगवेगळ्या अफवा नागरिकांमध्ये पसरवत असल्याने धक्कादायक प्रकार घडत आहेत. याच अफवांमुळे जमावाने तीन जणांची हत्या केल्याचं काल उघड झालं होतं. या प्रकरणी आरोपींवर कलम 302, 120(ब)427, 147, 148, 149/307, 353, 333, 323, 341 कासा पोलीस ठाण्यात एकूण तीन गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. 110 जणांना अटक करण्यात आली असून इतर 200 ते 300 जण फरार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील कांदिवलीहून आपल्या गुरुचे निधन झाले म्हणून त्यांच्या अंत्यविधीसाठी सुशील गिरी महाराज (35), चिकणे महाराज (70) आणि चालक निलेश तेलगडे (30) इको कारने सूरतकडे निघाले होते. त्यांच्याकडे कोणताही पास नसल्याने त्यांना चारोटी टोलनाका येथे पोलिसांनी माघारी पाठवले. परंतु, त्यांना सूरत गाठायचंच होतं म्हणून ते माघारी फिरून आड मार्गाने विक्रमगडहून जव्हार-दाभाडीमार्गे दादरा नगर हवेलीच्या हद्दीवर असलेल्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे रात्री 9.30 वाजेच्या सुमारास पोहचले.


Coronavirus | कोरोनामुळे ताटातूट झालेल्या मायलेकीची तब्बल एकवीस दिवसांनी भेट

चोर समजून तिघांवर हल्ला
मात्र, त्याठिकाणी वनविभागाच्या चौकीजवळ असलेल्या जमावाने या तिघांची गाडी अडवली आणि चोर समजून दगड, कोयते, काठ्यांनी मारण्यास सुरुवात केली. त्यांच्यासह त्यांची कार पलटी केली. तेथे असलेल्या गार्डने प्रसंगावधान राखून पोलिसांना सूचना दिली. त्यामुळे तात्काळ 10.30 वाजेच्या सुमारास पोलीस आपल्या गाडीसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या तिघांना कारमध्ये बसवून जखमी अवस्थेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, जमाव शेकडोंच्या संख्येने असल्याने चार पोलिसांचे काहीच चालले नाही. यावेळी पोलिसांबरोबर असलेल्या जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ चौधरी यांनीही जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी या तिघांना कसंबसं आपल्या गाडीत बसवले.

राज्यात आज 328 नवीन कोरोना बाधित; वरळी, धारावीनंतर आता वडाळ्यात हॉटस्पॉट

पोलिसांवरही हल्ला
मात्र, त्यानंतर जमाव अधिक आक्रमक झाला आणि गाडीबरोबर पोलिसांवरही हल्ला चढवला. या घटनेतून पोलीस कसेबसे बचावले, परंतु त्या तीन जणांची जमावाने पोलिसांच्या गाडीतच दगड, काठ्या, कोयत्याने वार करुन निर्घृण हत्या केली. मृतांमध्ये सुशील गिरी महाराज, चिकणे महाराज आणि चालक निलेश तेलगडे यांचा सामवेश होता. तर कासा पोलीस ठाण्याचे पीएसआय कटारे व इतर तीन कर्मचारीही जखमी झाले आहे. घटनेनंतर पालघर पोलीस दलाचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. तेव्हाही जमाव आक्रमकच होता. पोलिसांनी हल्लेखोरांची धरपकड सुरू केली, त्यावेळीही काही हल्लेखोर लपून छपून पोलिसांवर दगडफेक करत होते. अशा स्थितीत जमाव पांगवण्यासाठी जव्हारचे उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे यांनी दोन राऊंड हवेत फायर केले. दरम्यान पोलिसांनी 110 जणांना ताब्यात घेऊन अटक केली. तरीही काही हल्लेखोर जंगलात पळून गेले. पोलिसांनी पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या नेतृत्वाखाली रात्रभर जंगलात ही शोध घेण्याचा प्रयत्न केला होता.

Corona Ground Report | कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचा ग्राऊंड रिपोर्ट | ABP Majha