Tomato Price Drop : भांडवल तर सोडा पण टोमॅटो (Tomato) पिकाला औषध फवारणी केली. ती औषध उधारीत आणली होती, ते पैसे सुद्धा झाले नाहीत, अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकऱ्याने दिली आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील गिरणारे (Girnare)ही मुख्य बाजारपेठ असलेल्या टोमॅटोचे दर एकदमच घसरले असून अवघ्या चाळीस पंन्नास रुपयांना टोमॅटो कॅरेटची विक्री होत आहे. शिवाय उच्च प्रतिच्या टोमॅटोला फक्त सव्वा दोन रुपये किलो एवढा दर मिळाल्याने हा जिल्हाभर चर्चेचा विषय ठरला आहे. 


नाशिक जिल्ह्यातील गिरणारे ही मुख्य बाजारपेठ असलेल्या टोमॅटोचे दर एकदमच घसरले असून अवघ्या चाळीस पंन्नास रुपयांना टोमॅटो कॅरेट ची विक्री होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत असून शेतकऱ्याला भांडवल तर सोडा मात्र औषधांचा खर्च सोडवणे मुश्किल झाले आहे. नाशिक जिल्ह्यात गिरणारे ही टोमॅटो मार्केट साठी मुख्य बाजारपेठ समजली जाते, मात्र याच बाजारपेठेत दिवाळीनंतर शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले आहे. जवळपास दिवाळीपूर्वी कॅरेटला सातशे ते आठशे रुपये भाव मिळत होता. तिथे आता अवघ्या चाळीस ते पन्नास रुपयांनी टोमॅटो कॅरेट विकले जात असल्याने शेतकऱ्याला भांडवल कस सोडवाव असा प्रश्न निर्माण झाले आहे. 


नाशिकच्या त्र्यंबक तालुक्यातील हिरडी (Hirdi) गावांसह इतर शेतकऱ्यांनी व्यथा मांडली. दरम्यान हिरडी गावचे तरुण शेतकरी भगवान महाले यांच्या उच्च प्रतिच्या टोमॅटोला फक्त सव्वा दोन रुपये किलो एवढा दर मिळाल्याने हा जिल्हाभर चर्चेचा विषय ठरला आहे. काल सायंकाळी गिरणारे बाजारात टोमॅटो घेऊन ते गेले असता त्यांच्या एकूण 62 कॅरेटला (एका कॅरेटमध्ये 20 किलो) दिल्लीच्या व्यापाऱ्याकडून फक्त 2 हजार 730 रुपये एवढा दर मिळाला. तर दुसरीकडे एका शेतकऱ्याला 55 रुपयांना कॅरेटचा भाव मिळाला. या सगळ्यांमध्ये शेतकरी रडकुंडीला आला असून एक नंबरच्या टोमॅटोला 20 रुपये कॅरेट मिळत असल्याने दुसऱ्या तिसऱ्या तिसऱ्या नंबरचा टोमॅटो हा फेकून द्यावा लागत आहे, तसेच जनावरांना खाऊ घालण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 


नाशिकच्या गिरणारे बाजारात मोठ्या प्रमाणावर टोमॅटो पिकाची आवक होत असल्याने भाव एकदमच कोसळले आहेत. दिवसेंदिवस टोमॅटोचे भाव कोसळत असल्याने व्यापारी वर्गावर रोष व्यक्त केला जात आहे. मात्र टोमॅटो कोणत्या तरी भावाने जावा, निदान घरी भाजीपाला नेता यावा यासाठी शेतकरी मार्केटला येत असल्याचेच शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच दिवाळीपूर्वी व्यापारी शेतकऱ्यांना विनवणी करत होता, आज मात्र परिस्थिती बदलून शेतकऱ्यांना व्यापाऱ्याच्या पाया पडण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे. संजय महाले या शेतकऱ्याला गिरणारे मार्केट मध्ये 20 किलोच्या कॅरेट टोमॅटोला भाव पन्नास ते साठ रुपये मिळाले. म्हणजेच एका किलोला जवळपास तीन ते साडे तीन रुपये इतका मातीमोल बाजार भाव मिळाला. या परिस्थितीमुळे उत्पादन खर्च तर दूरच तोडणी आणि वाहतूक खर्चही अर्धा मिळणार नसल्याने संतप्त होत या शेतकऱ्यांने आपली व्यथा मांडली. 


भांडवल दूरच औषधांची उधारी कशी फेडायची?
हिरडी येथील तरुण शेतकऱ्याने व्यथा मांडताना म्हणाले कि, यंदा पहिल्यांदा शेतीत उतरलो. लोकांकडून उसने पैसे घेऊन भांडवल उभं केले. सुरवातीला लागवड केली. चांगला भाव मिळेल म्हणजे उच्च प्रतीच्या औषधांची फवारणी केली. यातच ओळखीच्या औषध वाल्याकडून उधारीवर औषधे, खते आणून पिकाला लहानच मोठं केलं. मात्र आज भांडवल तर दूरच मात्र औषधांची उधारी देखील मिळणे मुश्किल झाले आहे. येथील सर्वच शेतकऱ्यांची एकच परिस्थिती झाली असून आता शेतकऱ्यांवर मोठं संकट उभं राहील आहे. त्यामुळे सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे या सर्व परिस्थितीवरून निदर्शनास येत आहे.