Nashik Child Trafficking : चाईल्ड ट्रॅफिकिंगच्या (Child Trafficking) संशयावरुन रेल्वे पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे महाराष्ट्रात (Maharashtra) खळबळ उडालेली असतानाच विरोधी पक्षाने देखील याबाबत कठोर कारवाईची मागणी केली आहे. चाईल्ड ट्रॅफिक हा अतिशय गंभीर मुद्दा असून गृहखात्याने आतातरी हा विषय गांभीर्याने घ्यावा, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे. तर सरकारला याबाबत कडक कारवाई करावी लागेल, तेव्हाच हे नक्की काय आहे ते समजेल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी नेते छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) दिली आहे. 


दोन दिवसांपूर्वी मनमाड रेल्वे स्थानकांसह (Manmad Railway) जळगाव जिल्ह्यातील भुसावळ रेल्वे स्थानकावर (Bhusawal Railway) चाईल्ड लाईनच्या माध्यमातून (Child Line) 59 बालकांची सुटका करण्यात आली. यानंतर महाराष्ट्रात बालकांची तस्करीचे मोठे प्रकरण उघडकीस आल्याचे सांगण्यात आले. यातील बालकांना जळगाव, नाशिक मधील बालसुधारगृहात ठेवण्यात आले. त्यांचे समुपदेशन करण्यात आले. त्याचबरोबर बिहार राज्यात वास्तव्यास असलेल्या त्यांच्या पालकांशी संवाद साधण्यात आला. यावरुन ही मुलं तस्करीसाठी नाही तर शिक्षणासाठी महाराष्ट्रात पाठवल्याचा दावा त्यांच्या पालकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान यावरुन राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 


ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, "चाईल्ड ट्रॅफिकिंग हा अतिशय गंभीर मुद्दा असून बिहारमधून महाराष्ट्रात ही मुलं आली. महाराष्ट्रातील सांगली आणि इतर परिसरात मुलांना आणले जात होते. त्यामुळे गृहखात्याने आतातरी हा विषय गांभीर्याने घ्यावा." तर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले की, "पेपरमध्ये वाचलं की त्यांना सातत्याने प्रश्न विचारत आहेत, पण समाधानकारक उत्तर देत येत नाहीत, तपास यंत्रणेला कळत नाही, खरी माहिती सुद्धा येत नाही. सरकारला कडक कारवाई करावी लागेल, तेव्हाच समजेल काय आहे ते." आता या विषयावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नक्की काय बोलणार याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.  


संजय राऊत नाशिक दौऱ्यावर 


दरम्यान ठाकरे गटाचे संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असून काल सायंकाळी उशिरा माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, "महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरुन चर्चा सुरु आहेत. लोकसभेच्या 48 जागांचा आढावा घेतलाच पाहिजे. कोणाची कुठे ताकद आहे. महाराष्ट्रातच नाही, देशात विचार व्हायला पाहिजे. जिंकेल त्याची जागा हे सूत्र असायला पाहिजे. मला सुद्धा यावर चर्चा करता येणार नाही. जाहीरपणे चर्चा करायची नाही, हे ठरले आहे. प्रत्येक पक्ष सर्व जागांचा आढावा घेत आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा सुरू आहे. किमान चाळीस जागा जिंकायच्या असून जिंकण हे लक्ष आहे. त्यामुळे 18 जागा आमच्या होत्या, त्या आम्ही लढणारच."


थुंकण्यावर बंदी आहे का?


तर काल पत्रकार परिषदेदरम्यान संजय राऊत हे थुंकल्याचे दिसून आले. यावरुन राजकीय वातावरण पेटण्याची चिन्हे आहेत. यावर थुंकण्यावर बंदी आहे का? असा सवाल करत सरकारने तसा अध्यादेश काढावा. माझ्या जिभेला त्रास झाला. माझ्या घरात मी होतो, माझी जीभ दाताखाली आली म्हणून मी थुंकलो, असे स्पष्टीकरण देत कुणाला वाटत असेल, त्यांच्या नावाने थुंकलो हा त्यांचा प्रश्न आहे. काही लोकांचे नाव आले आणि जीभ दाताखाली आली, असेही ते म्हणाले.