Sant Muktabai Palkhi : 'मुक्तपणें मुक्त मुक्ताई रत । हरिनाम सेवीत सर्वकाळ' असा अथांग महिला गायिलेल्या तसेच पहिला मान असलेल्या संत मुक्ताबाईंची पालखी मजल दर मजल करत मानाची पालखी पंढरपुरात (Pandharpur) दाखल झाली आहे. यंदा 150 किलोमिटरचे अंतर आणि 10 दिवसांचा प्रवास कमी करत संत मुक्ताबाईंची पालखी (Sant Muktabia Palkhi) 25 दिवसात पोचली आहे. आज आषाढी सोहळ्यासाठी वातावरण भक्तिमय असून वरुणराजाने मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे स्वागत मुक्तहस्ताने केले. 


दरम्यान यंदा एक दिवस आधीच म्हणजेच 2 जूनला संत मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली होती. निवृत्तीनाथांच्या पालखीचा (Sant Nivruttinath Palkhi)  सोहळाही 02 जूनला सुरु झाला. जळगाव (Jalgaon) येथील कोथळी गावातील संत मुक्ताईंच्या समाधी स्थळापासून हा पालखी सोहळा मोठ्या उत्साहाने संत मुक्ताबाईच्या आणि विठुरायाच्या जयघोषात पंढरपूरला रवाना होण्यास सज्ज झाला होता. आज मुक्ताबाईंची पालखी पंढरपूरात दाखल झाली असून संत मुक्ताबाई यांना संत नामदेव यांनी गुरूस्थानी मानले असल्याने संत नामदेव यांच्या वंशजांनी आज पंढरपुरात स्वागत केले. सर्व सात मानाच्या पालख्यांमधून आज संत मुक्ताबाईंची पहिली मानाची पालखी पंढरपूरमध्ये पोचली. तापी ते भीमा असा प्रवास करून संत मुक्ताबाई पालखी सोहळा पंढरपुरात पोचला. 


सात मानाच्या पालख्यांमधील एक असणारी  संत मुक्ताबाई यांच्या पालखीनं पंढरीत दाखल झालेल्या पहिल्या पालखीचा मान मिळवला आहे. आज तीनच्या सुमारास मुक्ताबाई यांची पालखी पंढरपूरामध्ये दाखल झाली. आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या समाधीस्थळावरून आलेली ही मुक्ताबाईंच्या पालखीने गेल्या 25 दिवसात जवळपास 450 किलोमीटरचे अंतर पायी कापले आहे. संत मुक्ताबाई या संत ज्ञानेश्वरांच्या लहान भगिनी, संत मुक्ताबाई महिला संत असल्याने या पालखी सोहळ्यात 1500 महिला आणि 1000 पुरुष भाविक सामील झाले आहेत. मराठवाडा, विदर्भ , खानदेश आणि मध्यप्रदेशातून या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात भाविक सामील झाले. 


पंचवीस दिवसांनंतर पंढरपुरात दाखल 


दरम्यान गेल्या तेवीस दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यातून दिंड्यानी पंढरपुराकडे कूच केली आहे. चोवीस दिवसांच्या पायी वारीनंतर अनेक दिंड्या पंढरपुरात पोहचल्या आहेत. अनेक दिंड्या पंढरपूरच्या मार्गावर आहेत. त्या आज सायंकाळपर्यंत पंढरपुरला (Pandharpur) पोहचतील. संत मुक्ताबाईंची पालखी 2 जूनला पंढरपूरकडे मार्गस्थ झाली होती. त्यानंतर पंचवीस दिवसांच्या पायी प्रवासात पालखी मार्गात अनेक अडचणी आल्या. तरी विठुरायाच्या ओढीने यावर मात करीत हे भाविक आज पंढरपूर मध्ये पोचले. संत मुक्ताबाई या संत  नामदेवांचे आजेगुरु असल्याने या पालखी सोहळ्याच्या स्वागताला संत नामदेवांचे वंशज केशवदास महाराज पोचले होते. या स्वागत नंतर मुक्ताबाई यांच्या पादुकांना चंद्रभागेचे स्नान घालून ही पालखी  दत्त घाटावरील मुक्ताबाई मठात विसावली.