Chandicha Ganpati : सार्वजनिक गणेशोत्सव (Ganeshotsav) सुरु झाला होता, मात्र हुतात्मा अनंत कान्हेरे (Anant Kanhere) यांनी केलेल्या कलेक्टर जॅक्सनच्या वधानंतर 3 वर्ष नाशिकमध्ये तणावाचे वातावरण होते. ब्रिटिशांच्या (British) त्रासामुळे गणेशाची प्रतिष्ठापना करणे अवघड होऊन बसले. मात्र रविवार कारंजावरील नागरिकांनी ब्रिटिशांचा रोष पत्करुन अखेर 1928 साली मिठाईच्या दुकानात गणेशाची (Ganesh) स्थापना केली.


नाशिक (Nashik) शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. शहरात अनेक भागात मंदिरेच मंदिरे पाहायला मिळतात. त्यात गणेश मंदिराचा वेगळाच इतिहास वाचायला मिळतो. नाशिक शहरातील सर्वात जुने मंडळ म्हणून ख्याती असलेले मंडळ म्हणजेच रविवार कारंजावरील चांदीच्या गणपतीचे गणेशोत्सव मंडळ होय. गेल्या 104 वर्षांपासून नाशिककरांचे श्रद्धा स्थान बनलेले आहे. म्हणून नाशिकमधील चांदीचा गणपती हा मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो.


चांदीच्या गणपतीचा इतिहास...
तर सुरुवात अशी झाली की, 1913 सालापासून लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव व श्री गणेशोत्सव सार्वजनिक रित्या साजरी करण्यास सुरुवात केली. लोकमान्य यांनी सुरु केलेल्या या उत्सवांना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशातून प्रतिसाद मिळू लागला. पुण्याबाहेरचे जे सार्वजनिक गणेशोत्सव साजरे होऊ लागले, त्याचे लोण नाशिकमध्ये येऊन पोहोचले. जुन्या नाशिक आणि रविवार कारंजा परिसरातील नागरिकांनी 1917 सालापासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. मात्र ब्रिटिशांनी त्यावेळी हैदोस घातला होता, त्यामुळे रविवार कारंजा मित्र मंडळाला सरकारी रोष पत्करावा लागला. अनेकदा तर मंडळांनी दाखवलेल्या देखाव्यावर पोलीस खात्याने बंदी आणून देखावे दाखवण्यास मनाई केली. दरम्यान त्याचवेळी हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी नाशिकचे ब्रिटिश कलेक्टर जॅक्सन वध केला. त्यानंतर कार्यकर्त्यांची धरपकड सुरु झाली. त्यानंतर पुढील काही वर्षे मंडळासाठी फारच कठीण गेली. 


 



चांदीचा गणपती मंडळाकडून पूरग्रस्तांना मदत


मिठाईच्या दुकानात गणेश स्थापना...
त्यावेळचे श्रीमान गंगाप्रसाद पन्नालाल हलवाई यांनी सरकारी रोषाची तमान बाळगता 1928 साली श्रींची स्थापना आपल्या मिठाईच्या दुकानात केली. गंगाप्रसाद हलवाई हे एक व्यायाम प्रेमी होते. बुंदेलखंड येथून आलेले गंगाप्रसाद यांनी व्यापारातून यश मिळवले. त्यावेळी लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला गंगाप्रसाद यांनी पाठिंबा देत 1928 साली गंगाप्रसाद हलवाई यांनी आपल्या मिठाईच्या दुकानात पहिल्यांदा गणपतीची मूर्ती बसवली. आणि तिथूनच नाशिकमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरु झाला.


 



चांदीच्या गणपती मंडळाकडून सुरु करण्यात आलेल्या पाणपोईचे कवी कुसुमाग्रज यांचे हस्ते उद्घाटन


भिशीचे पैसे मोडले, अन...
स्वातंत्र्यानंतर मिठाईच्या दुकानातून रविवार कारंजा मित्र मंडळ नव्या जागेवर गणेशाची मूर्ती स्थापना करु लागले. त्यावेळी शाडूच्या मूर्तीपासून चार ते पाच फुटांची मूर्ती बनवली जात असे. मात्र या मूर्तीसाठी पाच ते सहा हजार रुपये खर्च येत असायचा. तसेच विसर्जनाला देखील अडचणीत असायची. म्हणून मंडळाने चांदीची मूर्ती बनवण्याचे सुचवले. यावेळी उपस्थित गणेश भक्ताने आपले भिशीचे सर्व पैसे या चांदीच्या मूर्तीसाठी दान दिले. त्याचबरोबर इतरांनीही रक्कम जमा करत 1978 पहिल्यांदा 11 किलो चांदीची मूर्ती स्थापन करण्यात आली. 


 



किल्लारी येथील भूकंपग्रस्तांना मदत


रविवार कारंजा मंडळाचे विशेष...
दरम्यान रविवार कारंजा मित्र मंडळ म्हणजेच चांदीच्या गणपतीच्या माध्यमातून 2001 साली धर्मार्थ दवाखाना स्थापन करण्यात आला. त्याचबरोबर पतपेढी देखील उभारण्यात आली आहे. शिवाय 1988 मध्ये चांदीच्या गणपती मंडळाकडून रविवार कारंजावरील यशवंत मंडई जवळ 450 लिटरची क्षमता असलेली पाणपोई उभारण्यात आली. या पाणपोईसाठी त्यावेळी 70 हजार रुपये खर्च करण्यात आला होता. तर कवी कुसुमाग्रज यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन झाले होते.