Dhananjay Munde On Eknath Shinde: पावसाळी अधिवेशनाचा (monsoon assembly session) आजचा तिसरा दिवस सत्ताधारी आणि विरोधकांच्या फटकेबाजीने चांगलाच गाजला. तर अशीच काही फटकेबाजी राष्ट्रवादीचे आमदार तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सुद्धा केल्याचे पाहायला मिळाले. नगर परिषद अध्यक्ष जनतेतून निवडून दिले जावेत यासंबंधीच्या विधेयकवरून माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्र्यांनी 'एकनाथ'च रहावे 'ऐकनाथ' होऊ नये असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला. 


यावेळी बोलतांना मुंडे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय आता मुख्यमंत्री झाल्यानंतर बदलावा लागतो हे दुर्दैव आहे. तर राज्याचे नाथ म्हणवणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी 'एकनाथ'च राहावे, 'ऐकनाथ' होऊ नये अशी कोपरखळी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावली. 


मुंडेंची फटकेबाजी...


नगर परिषद अध्यक्ष हे जनतेतून थेट निवडले जावेत या विधेयकावर चर्चा होत असताना धनंजय मुंडे यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांनी या विधेयकाचा जोरदार विरोध केला. विशेष म्हणजे मागील सरकारमध्ये नगरविकास मंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे यांनीच निवडून आलेल्या सदस्यांमधून नगराध्यक्ष निवडायचा निर्णय तत्कालीन मंत्रिमंडळात मांडून मंजूर केला होता. मात्र सत्ता बद्दलताच मुख्यमंत्र्यांनी स्वतःच घेतलेला निर्णय स्वतःच बदलला हे ऐकनाथ झाल्याचे लक्षण असल्याची मिश्किल टिप्पणी मुंडेंनी केली. 


मुख्यमंत्र्यांची निवड देखील जनतेतून करा...


आपण सर्व लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सोबतच्या नगरसेवक कार्यकर्त्यांना न्याय व संधी देण्यासाठी प्रयत्न करत असतो. अनेक नगरसेवक मुख्यमंत्र्यांकडे देखील आपल्याला नगराध्यक्ष होण्याची संधी देतील या अपेक्षेने पाहत आहेत. मात्र त्या नगरसेवकांच्या आशेवर मुख्यमंत्र्यांनी पाणी फिरवले असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. यावेळची विधानसभा अत्यंत वेगळी असून सर्व पक्षांना मत दिलेल्या जनतेला आपापले पक्ष सत्तेत आल्याचा आनंद मिळतो आहे. अशीच परिस्थिती समजा नगर परिषद निवडणुकीत झाली तर पक्ष कोणता अन नगराध्यक्ष कोणाचा अशी विचित्र परिस्थिती निर्माण होऊ शकते, अन त्याउपरही हा निर्णय घ्यायचाच असेल तर मग मुख्यमंत्र्यांची निवड देखील जनतेतून होऊन जाऊद्या, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी सरकारला केले. 


गोगलगायींनी हैराण झालेल्या शेतकऱ्यांनाही मदत करा


बीड,लातूर व उस्मानाबाद यासह काही जिल्ह्यातील सोयाबीन पिकांचे गोगलगायिनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले. तीन-चार वेळा पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पीकही हाती लागले नाही. अशा शेतकऱ्यांना कपाशी वर पडलेल्या बोंड अळीवर ज्याप्रमाणे विशेष मदत देण्यात आली, त्याप्रमाणे गोगलगायीनी नुकसान केलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची गरज आहे. झालेल्या नुकसानीची दाहकता व प्रमाण पाहता राज्य सरकारने अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना नुकत्याच जाहीर केलेल्या एन डी आर एफच्या निकषांप्रमाणे मदतीच्या तिप्पट मदत देण्यात यावी, अशी लक्षवेधी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत मांडून सरकारचे लक्ष वेधले.