Jalna: जालना येथील पाणी प्रश्नावरून आज भाजपकडून जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे.  सिल्लोडचा औरंगजेब माझ्यावर टीका करायला भाड्याने सोडलाय, दम असेल तर समोर या एकाच स्टेजवर असा इशाराही दानवे यांनी सत्तार यांना दिला आहे. तर याचवेळी त्यांनी शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर सुद्धा निशाणा साधला आहे. 


यावेळी बोलताना दानवे म्हणाले की,  सत्तधारी पक्षाचे लोकं फक्त निवेदन देण्याचे काम करतात. पण अडीच वर्षात आणले काय असा प्रश्न दानवे यांनी विचारले. आम्ही म्हणतो पाणी पाजलं पाहिजे. काही लोकांना नाटक करतात, त्यामुळे आमच्या मोर्च्याला पाठींबा दिल्याचा त्यातला हा प्रकार आहे. सिल्लोडचा औरंगजेब माझ्यावर टीका करायला भाड्याने लावून दिलाय, दम असेल तर समोर या एकाच स्टेजवर असेही दानवे म्हणाले. 


खोतकर यांच्यावर निशाणा...


यावेळी दानवे यांनी अर्जुन खोतकर यांच्यावर टीका केली. दोनवेळा मंत्री राहून सुद्धा तुम्ही कोणते 5 काम केले ते सांगा, हिंमत आणि दम असेल तर समोरासमोर या एका स्टेजवर असे आवाहन दानवे यांनी खोतकर यांना दिलं आहे. माझ्यावर टीका करण्यासाठी यांनी भाड्याने औरंगजेब लावून दिला आहे. आता तो म्हणतो जालना नगरपालिकेच्या मदतीला मी प्रचाराला जाईन, छत्रपतीच्या मदतीला औरंगजेब अशी खोचक टीका दानवे यांनी केली. तर निवडणुकीत सत्तार आणि खोतकर दोघांनाही मी खिशात घालतो असेही दानवे म्हणाले.