Eknath shinde : मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) पहिल्यांदाच महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नाशिक (Nashik) जिल्ह्यापासून त्यांच्या या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. मध्यरात्री 2 वाजता मुख्यमंत्र्यांचं मालेगावमध्ये आगमन झालं. यावेळी शिंदे समर्थक आमदार दादा भुसे (Dada Bhuse) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिंदेंचं जंगी स्वागत केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आयोजकांना डीजे बंद करायला लावला. तसंच माईक न वापरता मुख्यमंत्र्यांनी मालेगावच्या नागरिकांना मुंबईत येण्याचं निमंत्रण दिलं. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांच्या नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. 


कसा असेल मुख्यमंत्र्यांचा दौरा


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 30 व 31 जुलै 2022 रोजी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शनिवार, 30 जुलै 2022 दुपारी 3 वाजता मालेगाव येथून मोटारीने वैजापूरकडे रवाना होतील. संध्याकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृह, वैजापूर येथे आगमन व राखीव वेळ असणार आहे. त्यानंतर 6.30 वाजता वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे मुख्यमंत्री यांची जाहीर सभा होणार आहे. सभेनंतर रात्री 8 वाजता वैजापूर येथून मोटारीने औरंगाबादकडे रवाना होतील. 10 वाजता शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आगमन, राखीव व मुक्काम असेल.


दरम्यान, मुख्यमंत्री मालेगाव जिल्हा निर्मितीची घोषणा करणार का याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी निष्ठा यात्रा काढलेल्या भागात मुख्यमंत्री शिंदेंचा दौरा आखण्यात आला आहे. त्यामुळं शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी शिंदे गटानं केली आहे. तसेच मुख्यमंत्री मालेगाव जिल्ह्याची घोषणा करणार का? याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्र दौऱ्यातून शिंदेंचा शक्तीप्रदर्शन करत असल्याचे दिसत आहे. 




खासदार इम्तियाज जलील यांची मुख्यमंत्र्यांवर टीका


एकीकडे राज्यात अतिवृष्टीमुळं शेतकरी चिंतेत आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री मात्र सत्कार सोहळे घेत फिरत असल्याचे म्हणत औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना सहानुभूती देण्याची गरज असताना मुख्यमंत्री मात्र एसीत बसून आढावा घेणार आहेत. मंत्रिमंडळाचे सोडा निदान कृषीमंत्री तरी राज्याला द्या अशी टीका शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केली होती. त्यानंतर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील मंत्रीमंडळ विस्ताराच्या मुद्यावरुन शिंदे सरकारवर टीका केली आहे.


एकनाथ शिंदे विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार
 
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहे. आजपासून एकनाथ शिंदेंचा दोन दिवसीय औरंगाबाद दौरा असणार आहे. त्यांच्या या संपूर्ण दौऱ्यात दोन राजकीय सभा होमार आहेत. तसेच  पत्रकार परिषद देखील होणार आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विविध कार्यक्रमांना हजेरी सुद्धा लावणार आहे. सोबतच अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीचा आढावा मुख्यमंत्री शिंदे घेणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात सर्वाधिक शिवसेनेचे आमदार हे औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत. त्यामुळं मुख्यमंत्री शिंदेंचा औरंगाबाद दौरा महत्त्वाचा समजला जात आहे.


महत्त्वाच्या बातम्या: