Nashik News : नाशिकच्या (Nashik) पश्चिम पट्ट्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) आदी आदिवासी दऱ्याखोऱ्यात असलेल्या मोहफुले चांगलीच बहरली आहेत. या भागातील आदिवासी बांधवाना मोहाच्या झाडापासून चांगले उत्पन्नही मिळत आहे. मात्र यंदाच्या वर्षी वातावरणीय बदलामुळे मोहफुलांच्या उत्पन्नात घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आदिवासींच्या रोजीरोटीवरही गदा आलेली आहे. 


मोहफुल माहित नाही असा मनुष्य नाही, मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पानगळती झाल्यानंतर मोहाच्या (Madhuca Longifolia) झाडाला मोहफुले येतात. ही मोहफुले अगदी वासानेही मन बहरून टाकतात. डोंगर दऱ्यात आदिवासी (Tribel Area) वनपट्ट्यात ही झाडे हमखास आढळून येतात. त्यामुळे गेल्या काही वर्षात मद्यच नाही तर आदिवासी भागातील नागरिकांनी या मोहफुलाचा चांगला उपयोग करण्यास सुरुवात केली आहे. मात्र यंदा मोह फुलांच्या उत्पन्नात कमालीची घट झाली असून या फुलामध्ये मोठ्या प्रमाणात घट दिसून येत आहे. त्यामुळे आदिवासींच्या रोजगार, उदर्निवाहावर परिणाम होण्याची शक्यता आहे. 


विशेष म्हणजे या वर्षी अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) अनेक फळांचेही नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर मोह फुलांची परीस्थिती झाली आहे. यावेळी अचानक झाडामध्ये बदल होऊन त्यांना लवकर पालवी फुटल्याने फुलांची गळती कमी झाली असून कधी थंड तर कधी गरम वातावरण तयार होत आहे. तर रात्रीच्या वेळी काही झाडाच्या फुलांचा सडा पाडतो. तो कमी प्रमाणात दिसून येत आहे. मोह फुलाच्या वाढीसाठी दमट आणि उबदार वातावरण अपेक्षित असते. मात्र सद्यस्थितीत अद्यापही हवेत गारवा असल्याने आणि दुपारी कडक ऊन पडत असल्याने मोह फुलांच्या उत्पादनात घट झाली आहे. 


मोह फुलांपासून अनेक पदार्थ 


आदिवासी ग्रामीण भागात या झाडाचे पूर्वापार पासून मोह फुलाचा उपयोग केला जातो. सकाळी उठल्याबरोबर आदिवासी बांधव ही फुले वेचण्यासाठी जात असतात. त्यानंतर ती काही दिवसांकरिता सुकवून बाजार नेली जातात. हल्ली घरीच मोह फुलापासून चटणी, लाडूसह इतर पदार्थ तयार केले जातात. या पदार्थाना बाजारात चांगली मागणी देखील आहे. त्यामुळे आदिवासींसाठी हे उत्पनाचे साधन बनले आहे. मात्र यंदा उत्पादनात घट झाल्याने हे चित्र वेगळे असणार आहे. नंतर आलेल्या बियांना मोहठी म्हटलं जाते. त्यापासून तेल काढले जाते, त्याचा उपयोग रोजच्या स्वयंपाकातही केला जातो. तर कच्च्या मोहट्यापासून रुचकर भाजी बनवली जाते. 


मोह फुलांना वातावरणाचा फटका 


दरम्यान नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात सध्या मोह फुलांना जोर आला आहे. पहाटेपासूनच अनेक आदिवासी बांधव मोहफुले वेचण्यासाठी घराबाहेर पडतात. अनेकजण तर रात्री झाडाखाली झोपण्यासाठी जाऊन सकाळी लवकर उठून मोह फुले वेचतात. या मोहफुलांना अधिक बहरण्यासाठी दमट आणि उबदार वातावरणासाठी आवश्यकता असते. मात्र सद्यस्थितीत गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस, हवेतील गारवा, कधी उष्ण वातावरण यामुळे मोह फुलांचा बहर गळून गेला आहे. त्यामुळे साहजिकच त्याचा परिणाम मोहफुलांवर झाल्याचे चित्र आहे.