Maharashtra Monsoon Assembly Session : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे. हे शिंदे-फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन आहे. काल विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस पार पडला. पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. आज कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या


अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, विरोधक विविध मुद्द्यांवरून होणार आक्रमक


 विरोधी पक्षाचा आज प्रस्ताव असणार आहे. त्यामुळे विरोधक शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, कायदा व सुव्यवस्था, शिंदे सरकारची स्थापना या मुद्यावर आक्रमक होतील. हीच आक्रमकता सभागृहाच्या बाहेरही पाहायला मिळेल. सकाळी दहाच्या आधी विरोधकांचं पाय-यांवर ही आंदोलन होणार आहे. 


काय घडलं अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी


काल सकाळी 11 वाजता अधिवेशनाला सुरुवात झाली. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी द्रोपदी मुर्मू यांची देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्द्ल अभिनंदन केलं. तसेच जगदीप धनखड यांचंही उपराष्ट्रपती निवड झाल्याबद्दल अभिनंदन केलं. दरम्यान विधिमंडळाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ही राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींचं अभिनंदन केलं. राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्यामुळे स्त्री शिक्षण, स्त्री हक्काला बळ मिळेल, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. यासह आज अधिवेशनात नवनिर्वाचित मंत्र्याचा परिचय करण्यात आला.


25 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर


पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 25 हजार 826 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने प्रति हेक्टरी 13 हजार 600 रुपये मदत देणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, आज विधीमंडळात सादर झालेल्या पुरवणी मागणीत याची तरतूद करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कधी मदत मिळणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. 


विरोधकांचा सरकारवर निशाणा


विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशन कसं असेल याची झलक सुरुवातीलाच पाहायला मिळाली. विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून ईडी सरकार हाय हाय, स्थगिती सरकार हाय हाय अशा घोषणाबाजी करत शिंदे-फडणवीस सरकारचा जोरदार निषेध केला.


17 ते 25  ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार


विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Session) 17 ते 25  ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतील बंडामुळं महाविकास आघाडीचे सरकार कोसळलं. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे.