Maharashtra MLC Election :  महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची आठ मतं फुटल्याने घोडेबाजार झाल्याचा आरोप होत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आरोप केल्यानंतर आता शरद पवार गटाकडूनही आरोप करण्यात आला आहे. पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केला आहे. आव्हाड यांनी म्हटले आहे की, विधान परिषद तुम्ही पैशांचा जुगार खेळून जिंकली. पाच कोटी कॅश देत आमदारांची मतं विकत घेतली आहेत. 25 कोटी रुपयांना एक मत विकत घेण्यात आलं. जे कुणी फुटले असतील त्यांच्याबाबत त्यांच्या मतदारसंघातील मतदारांना आवाहन करतो, गद्दारी करणाऱ्यांना जोड्याने मारा. 


4 कोटी देतो मत द्या, अशी विनंती करणारा फोन आला


त्यांनी सांगितले की, माझ्या पक्षाबद्दल बोलायचं झालं तर मी स्पष्टपणे सांगतो पवार साहेबांनी आम्हाला एकदा सांगितलं की आम्ही तेच करतो. त्यामुळे मतं फुटायची शक्यता नाही. आम्ही पवार साहेबांची माणसं आहेत त्यांच्या घरी बसतो. जर फुटलं असेल तर लाज वाटेल ना जाणाऱ्या व्यक्तीला. आमच्या एका आमदाराला 4 कोटी देतो मत द्या अशी विनंती करणारा फोन आला होता. मला तो आमदार आणि ज्याने फोन केला होता तो देखील माहिती आहे.


काँग्रेसच्या आमदारांकडून क्रॉस व्होटिंग


दरम्यान, 37 आमदार असलेल्या काँग्रेसने आपल्या उमेदवार प्रज्ञा सातव यांच्यासाठी 30 प्रथम पसंतीच्या मतांचा कोटा निश्चित केला होता आणि उर्वरित सात मते मित्रपक्ष शिवसेनेचे (यूबीटी) उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना जातील, असे नियोजन होते. पण, सातव यांना पहिल्या पसंतीची 24 मते मिळाली आणि नार्वेकर यांना 22, म्हणजे काँग्रेसच्या किमान सात आमदारांनी क्रॉस व्होट केलं आहे. सत्ताधारी महायुतीने लढलेल्या सर्व नऊ जागा जिंकल्या, तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील NCP (SP) समर्थक शेतकरी आणि कामगार पक्षाचे (PWP) जयंत पाटील यांचा पराभव झाला. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर आणि विरोधी MVA मधून काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव विजयी झाल्या. 


भाजपने पाच उमेदवार उभे केले होते, त्यात महाराष्ट्राच्या माजी मंत्री पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश होता. शिवसेनेने दोन माजी लोकसभा सदस्य शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना तिकीट दिले होते. काँग्रेसने सातव यांना आणखी एका टर्मसाठी, तर शिवसेनेने (यूबीटी) नार्वेकर यांना उमेदवारी दिली होती, तर शरद पवार गटाने जयंत पाटील यांना पाठिंबा दिला होता.


 इतर महत्वाच्या बातम्या