Maharashtra MLC Election : लोकसभा निवडणुकीनंतर विधानपरिषद निवडणुकीमध्ये उद्या (12जुलै) महायुती महाविकास झटका देणार की महाविकास आघाडी लोकसभेतील दबदबा कायम ठेवणार? याची चर्चा रंगली आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्याने 12 वा उमेदवार कोणाचे बारा वाजवणार याची सुद्धा चर्चा रंगली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पाठिंबा असलेले उमेदवार तथा शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी थेट काँग्रेसचे तीन ते चार आमदार क्राॅस व्होटिंग करणार असल्याचा दावा केला आहे. 


काँग्रेसकडील तीन ते चार मते क्रॉस व्होटिंग होणार


ती तीन ते चार मते वगळून मी जिंकून येणार असल्याचा दावा सुद्धा जयंत पाटील यांनी केला. पाटील म्हणाले की माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला कुठे धाकधूक दिसते का? दिसणारच नाही. कारण आमच्या तिन्ही उमेदवारांना पूर्ण निवडून येणार असल्याचा विश्वास आहे. आमच्याकडे क्रॉस वोटिंग होणार नाही. काँग्रेसकडील तीन ते चार मते क्रॉस वोटिंग होणार आहेत. ती आम्ही सोडलीच आहेत. ते फक्त नावालाच काँग्रेसमध्ये असल्याचे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे आम्ही त्या मतांना सोडून दिलं आहे.  जयंत पाटील यांनी शरद पवार यांचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले. त्या संदर्भात मला मत द्या, असं मी कोणालाही बोलले नाही. कारण मला विश्वास आहे की माझी मत माझ्यासोबत आहेत. त्यासाठी हॉटेलमध्ये सुद्धा ठेवण्याची गरज नाही. 



काँग्रेसचे ते चार उमेदवार कोण?


दरम्यान, काँग्रेसचे तीन ते चार आमदार क्रॉस व्होटिंग करणार असल्याचा दावाच शेकापचे जयंत पाटील यांनी केल्यानंतर ते आमदार कोण? याचीच चर्चा रंगली आहे. ही चर्चा रंगल्यानंतर अर्थातच नांदेड जिल्ह्यातील आमदारांकडे लक्ष गेलं आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला नांदेडमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. 


त्यामुळे आता खासदारकी मिळाल्याने अशोक चव्हाण यांना आता समर्थक आमदारांची कोणत्याही परिस्थितीत मते खेचण्यासाठी दबाव असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जयंत पाटील यांच्या निशाण्यावर अशोक चव्हाण आमदार तर नाहीत ना? अशी सुद्धा चर्चा आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील अशोक चव्हाण समर्थक आमदार माधवराव पाटील जवळगावकर, मोहन अण्णा हंबर्डे आणि जितेंद्र अंतापूरकर हे आमदार भाजपला मतदान करतील, अशी चर्चा आहे. 


कोणाकडे किती आमदार आहेत?


दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीसाठी 274 आमदार आहेत. विजयी उमेदवाराला प्रथम पसंतीची 23 मते मिळवावी लागतील. 103 सदस्यांसह भाजप विधानसभेत सर्वात मोठा पक्ष आहे, तर शिवसेनेचे 38, राष्ट्रवादीचे 42, काँग्रेसचे 37, शिवसेनेचे (यूबीटी) 15 आणि राष्ट्रवादीचे (एसपी) 10 सदस्य आहेत. सभागृहातील इतर पक्षांमध्ये बहुजन विकास आघाडीचे तीन, समाजवादी पक्षाचे दोन, एआयएमआयएम आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रत्येकी दोन, मनसे, सीपीआय(एम), स्वाभिमानी पक्ष, जनसुराज्य शक्ती पक्ष, आरएसपी, क्रांतिकारी शेतकरी पक्ष यांचा प्रत्येकी एक सदस्य आहे. आणि पीडब्ल्यूपी. याशिवाय 13 अपक्ष आमदारही आहेत.


ठाकरे गटाकडून 12 वे मिलिंद नार्वेकर रिंगणात


भाजपने पंकजा मुंडे, योगेश टिळकर, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत असे पाच उमेदवार उभे केले असून शिवसेनेने माजी लोकसभा सदस्य कृपाल तुमाने आणि भावना गवळी हे दोन उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादीने शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना तिकीट दिले आहे. ठाकरे गटाकडून 12 वे मिलिंद नार्वेकर रिंगणात आहेत, तर शेकापच्या जयंत पाटील यांना शरद पवार गटाचा पाठिंबा आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या