Navneet Rana And Ravi Rana : राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेले अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मुंबईतील विशेष न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. दरम्यान, आज त्यांची तुरुंगात सुटका होऊ शकते. नवनीत राणा आणि रवी राणा यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी 'मातोश्री'बाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याच्या जाहीर घोषणेवरून झालेल्या वादानंतर अटक करण्यात आली होती. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर ते किरीट सोमय्या खार येथील निवास्थानी त्यांची भेट घेणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.



नवनीत राणा आणि रवी राणा यांचा मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर
23 एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील खाजगी निवासस्थान 'मातोश्री'बाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याच्या जाहीर घोषणेवरून झालेल्या वादानंतर अटक करण्यात आली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याचे कारण देत या जोडप्याने ठाकरे यांच्या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची त्यांची योजना रद्द केली होती. दरम्यान, मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश आर.एन.रोकडे यांनी बुधवारी राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केला.


जामीन मंजूर करताना पाच अटी
दरम्यान, मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करताना पाच अटी घातल्या आहेत. न्यायालयाने घातलेल्या अटींनुसार, रवी राणा आणि नवनीत राणा यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच तपासात कोणतेही अडथळे आणू नये, असे आदेश न्यायालयाने त्यांना दिले आहेत. याशिवाय या घटनेशी संबंधित असलेल्या साक्षीदारावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणायचा नाही, त्यांना प्रलोभने दाखवून त्यांच्यावर प्रभाव टाकायचा नाही अशीही अट घातली आहे. विशेष म्हणजे कोर्टाने राणा दाम्पत्याने अशा प्रकारच्या गुन्ह्यात पुन्हा सहभाग घ्यायचा नाही, असेही सांगितले आहे. न्यायालयाच्या या अटींचे पालन राणा दाम्पत्याला करावे लागणार आहे.  जामिनावर सुटल्यानंतर अर्जदाराने असा कोणताही गुन्हा करू नये आणि प्रकरणाशी संबंधित कोणत्याही विषयावर माध्यमांशी बोलू नये, असे न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, आज त्यांची तुरुंगात सुटका होऊ शकते.    


संबंधित बातमी: 


Navneet Rana: राणा दाम्पत्याला सशर्त जामीन मंजूर, 'या' पाच अटींचे करावे लागणार पालन